अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आल्याने भाजप बहुमतात आली आहे. शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहावं लागलं असून, भाजप–काँग्रेस युतीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

Ambarnath Muncipal Council Election : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर येत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीमुळे नगरपरिषदेत भाजप बहुमतात येणार आहे.

भाजप–काँग्रेस–राष्ट्रवादीची 32 नगरसेवकांची युती

अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 असे एकूण 32 नगरसेवक एकत्र आल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. विशेष म्हणजे, ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्या भाजपनेच काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी

अंबरनाथ नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी बाजी मारली. शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर यांच्याविरोधात त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपकडे गेलं असलं, तरी सर्वाधिक नगरसेवक मात्र शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत.

शिंदे गटाचा पलटवार; ‘अभद्र युती’ची टीका

भाजप–काँग्रेस युतीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार टीका केली आहे. ही युती म्हणजे ‘अभद्र युती’ असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. काँग्रेससोबत जाऊन भाजपाने शिवसेनेचा घात केल्याचं शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे. ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपचं प्रत्युत्तर; ‘शिंदे गटासोबत सत्ता असती तर तीच अभद्र युती’

शिंदे गटाच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी म्हटलं आहे की, गेल्या 25 वर्षांत भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटासोबत सत्तेत बसलो असतो, तर तीच खरी अभद्र युती ठरली असती. आम्ही महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटाशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

23 जागा जिंकूनही शिंदे गट सत्तेबाहेर

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या असल्या, तरी सत्ता स्थापनेपासून त्यांना दूर राहावं लागलं आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या 59 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यात भाजप 16, काँग्रेस 12 आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली होती.