एका इन्फ्लुएन्सरने वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुरुवातीला ट्रेनमधील स्वच्छता आणि सुविधांचं कौतुक दिसतं, पण नंतर प्रवाशांनी मागे सोडलेला कचरा पाहून धक्का बसतो. या व्हिडिओमुळे सार्वजनिक स्वच्छतेच्या जबाबदारीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : सुनील आर नावाच्या एका इन्फ्लुएन्सरने (@maskedguyslife) इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वंदे भारत ट्रेनमधील काही प्रवाशांमध्ये असलेल्या नागरिक म्हणून जबाबदारीच्या अभावावर बोट ठेवण्यात आलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ट्रेनमधील स्वच्छता आणि सोयी-सुविधांचं कौतुक करण्यात आलं आहे. सुनीलने प्रवाशांना दिले जाणारे वर्तमानपत्र, जेवणाची सोय, सतत होणारी साफसफाई आणि कचरा व खरकटी ताटं गोळा करणारे कर्मचारी दाखवले आहेत. संपूर्ण व्हिडिओमध्ये ट्रेन एकदम सुस्थितीत आणि व्यवस्थित दिसत होती.

मात्र, व्हिडिओच्या शेवटी इन्फ्लुएन्सरने इतर प्रवाशांनी मागे सोडलेला कचरा दाखवला. ट्रेनमध्ये कचरापेट्या (डस्टबिन) असूनही आणि कर्मचारी सतत कचरा उचलत असतानाही, सीटच्या खाली आणि डब्यातील काही भागांमध्ये कचरा पडलेला दिसत होता.

व्हायरल व्हिडिओ पाहा

View post on Instagram
 

नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?

अनेक युजर्सनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कचऱ्यावर टीका केली. एका युजरने कमेंट केली, "हे किती दुर्दैवी आणि वाईट आहे." दुसऱ्याने लिहिले, "पैशाने क्लास विकत घेता येत नाही." तर तिसऱ्या युजरने म्हटले, "जर काही लोक सार्वजनिक वाहतूक आणि जागांना स्वतःच्या घरासारखं वागवणार नसतील, तर आपला देश कधीच स्वच्छ होऊ शकणार नाही."

ही चर्चा वाढत असताना, सुनीलने कमेंट्समध्ये स्पष्ट केलं की त्याचा व्हिडिओ वंदे भारत किंवा भारतीय रेल्वेवर टीका करणारा नाही. त्याने लिहिले, "ही रील वंदे भारत किंवा भारतीय रेल्वेच्या विरोधात नाही. उलट, मी त्यांच्या कामाचं कौतुक करतो."

त्याने ट्रेन आधुनिक, आरामदायी आणि सुस्थितीत असल्याचं कौतुक केलं. कर्मचारी सतत कचरा आणि ट्रे उचलत असल्याचंही त्याने नमूद केलं. तो म्हणाला की, यामुळेच प्रवाशांनी केलेला कचरा पाहून जास्त त्रास होतो. जेव्हा प्रवाशांना कचरापेट्या दिल्या जातात आणि कर्मचारी स्वतः कचरा गोळा करत असतात, तेव्हा सीटवर, सीटच्या खिशात किंवा जमिनीवर कचरा टाकण्याचं समर्थन करणं कठीण आहे, असं सुनीलने म्हटलं.

इन्फ्लुएन्सर म्हणाला की, भारतातील अनेक सार्वजनिक ठिकाणी, जसं की रस्ते, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांवर कचरा ही एक मोठी समस्या आहे. त्याने मान्य केलं की प्रत्येकजण असं वागत नाही, पण या समस्येकडे दुर्लक्ष करून ती सुटणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.