पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेतील भाविकांचा उत्साह कायम आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत आतापर्यंत लाखो भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.
जम्मू - देशभरातून भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मूला येत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मोठ्या संख्येने लोक आता थेट काश्मीर गाठून तिथूनच यात्रा सुरू करत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भीती आता भाविकांच्या उत्साहापुढे फिकी पडली आहे. केवळ सात दिवसांतच एक लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले आहे.
आतापर्यंतची सर्वात चोख सुरक्षाव्यवस्था
यावर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने सुमारे ६०० अतिरिक्त अर्धसैनिक दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. दररोज सरासरी ७ हजार भाविक जम्मूपासून टप्प्या टप्प्याने श्रीनगरकडे जाताना दिसत आहेत.
मोठ्या संख्येने भाविक रवाना
आतापर्यंत जम्मूपासून आठ गटांमध्ये एकूण ५५,३८२ भाविक रवाना झाले आहेत. परंतु मंगळवारपर्यंत एकूण १,११,००० हून अधिक भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे. इतरही भागातून भाविक येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बरेचसे भाविक थेट श्रीनगरला येऊन तेथून यात्रेत सहभागी होत आहेत.
३८ दिवस चालणार यात्रा
यावर्षी अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली असून ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा सणही आहे. ही यात्रा एकूण ३८ दिवस चालणार आहे. अमरनाथची पवित्र गुहा समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर उंचीवर आहे, जिथे भाविक दोन मार्गांनी पोहोचू शकतात - पहलगाम आणि बालटाल.
भाविक एकाच दिवशी दर्शन घेऊन बेस कॅम्पला परतू शकतात
दुसरीकडे, बालटाल मार्ग लहान आहे आणि त्यात केवळ १४ किलोमीटर चालत भाविक एकाच दिवशी दर्शन घेऊन बेस कॅम्पला परतू शकतात. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर सेवा सुरू नाही, त्यामुळे सर्व यात्रीकांना पायीच प्रवास करावा लागत आहे. तरीही भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. दररोज हजारो लोक बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी येत आहेत.


