Kangana Ranaut on Baba Ramdev : अभिनेत्री कंगना रणौतने बाबा रामदेव यांच्या 'जवानी'वरील वक्तव्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. 'ते माझ्या बेडरूममध्ये वटवाघळासारखे लटकले होते का?' असा थेट सवाल तिने केला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही काळापासून दोघेही एकमेकांवर टीका करत आहेत. बाबा रामदेव यांनी कंगनाच्या 'जवानी'वर टीका केली होती. पण कंगनाला हे अजिबात आवडलं नाही आणि तिने लगेचच सडेतोड उत्तर दिलं. आता पुन्हा एकदा एका मुलाखतीत तिने बाबा रामदेव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
DD न्यूजशी बोलताना कंगना म्हणाली, “जेव्हा त्यांची स्वदेशी चळवळ सुरू झाली, तेव्हा सरकारनेही त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. पण मला वाटतं की ते आता भांडवलशाहीत खूप पुढे गेले आहेत. सनातन विचार आणि भांडवलशाही एका टप्प्यानंतर एकमेकांशी जुळत नाहीत."
'रामदेव आता व्यावसायिक झाले आहेत'
कंगनाने पुढे टीका केली की, रामदेव यांनी आयुर्वेद, जडीबुटी आणि योगाच्या पलीकडे जाऊन आपला व्यवसाय वाढवला आहे. “आयुर्वेद, जडीबुटी आणि योगासाठी मिळालेल्या प्रोत्साहनातून ते आता बनियान आणि अंडरवेअर विकण्याच्या व्यवसायात उतरले आहेत. व्यावसायिक होण्यात काहीच गैर नाही, पण तुम्ही जे नाही आहात, त्याचा बुरखा पांघरू नका,” असंही ती म्हणाली.
कंगनाने बाबा रामदेव यांना दिलं उत्तर
या मुलाखतीत कंगनाला रामदेव यांच्या जुन्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं, ज्यात त्यांनी कंगनाच्या बालपणावर आणि तरुणपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर कंगनाने सडेतोड उत्तर दिलं. रामदेव म्हणाले होते, “उनकी क्वॉलिफिकेशन क्या है? उनका बचपन कैसा रहा है? उनकी जवानी कैसी रही है? उनके पहले के कारनामे कैसे रहे हैं? मैं ऐसे लोगों के बारे में बात नही करना चाहता.”
कंगना काय म्हणाली?
यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, “बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये वटवाघळासारखे लटकले होते का? त्यांनी मला माझ्या तरुणपणी पाहिलं होतं का? त्यांनी असं काय पाहिलं?” तिने पुढे विचारलं, “त्यांनी नेमकं काय पाहिलं हे मला समजत नाहीये. त्यांनी काय पाहिलं, हे स्पष्ट सांगावं.”
असा सुरू झाला होता वाद
हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा कंगनाने Gen Z पिढीवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनातील काही तरुण आंदोलकांचे व्हिडिओ पाहून कंगनाने त्यांना “जनरेशन गटर” म्हटलं होतं. यानंतरच रामदेव यांनी तिच्यावर टीका केली होती.


