पुण्यातील तळवडे परिसरात बुधवारी (२५ जून) पहाटे प्रेमसंबंधातून एका महिला आणि पुरुषाचा दगडाने ठेचून खून केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Pune Crime : सध्याच्या बदलत्या काळात नात्याची व्याख्या बदलली गेली आहे. याला कारणीभूत म्हणजे नात्यातील विश्वास कमी होणे किंवा अन्य काही कारणे असू शकतात. पण सध्या नात्यात शुल्लक वादातूनही हत्या करण्यासारख्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील तळवडे परिसरात बुधवारी (२५ जून) पहाटे एक धक्कादायक दुहेरी खून घडला आहे. प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या द्वेषातून एका महिलेने तिच्या दोघांपैकी दुसऱ्या प्रियकरासोबत असताना तिसऱ्या प्रियकराने रागाच्या भरात दोघांचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीला ठोकल्या बेड्या

या हत्याकांडात मरण पावलेले दोघे म्हणजे मंगला सूरज टेंभरे (३० वर्षे, तळवडे, मूळ रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५५ वर्षे, तळवडे, मूळ रा. अकोला) आहेत.या दोघांचा खून करणारा आरोपी दत्तात्रय लक्ष्मण साबळे (४९ वर्षे, रा. म्हेत्रे वस्ती, चिखली, मूळ रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगला हिला दोन मुले आहेत.

प्रकरण काय आहे?

देहूरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला, जगन्नाथ आणि दत्तात्रय हे तळवडे परिसरात राहत होते. मंगला आणि जगन्नाथ हे दोघे मजुरीचे काम करत असत, तर दत्तात्रय मजूर पुरवण्याचे कंत्राट घेत असे.मंगला हिचे जगन्नाथ व दत्तात्रय या दोघांशीही अनैतिक संबंध होते. हे संबंध दत्तात्रयला समजल्यावर तो प्रचंड चिडलेला होता.

खूनाचा घटनाक्रम

मंगळवारी रात्री मंगला आणि जगन्नाथ हे दोघे दारू पिऊन मोकळ्या मैदानात बसले होते.त्याचवेळी दत्तात्रयने तेथे येत, अर्धनग्न अवस्थेत असलेल्या दोघांना पाहिले आणि रागाच्या भरात त्याने दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना तळवडे येथील दिगाटेक प्रकल्पाजवळ घडली. हत्या केल्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह दहा फूट अंतरावर फेकून दिले.

घटनेनंतर रात्री दोनच्या सुमारास दत्तात्रय स्वतः मंगला हिच्या पतीकडे गेला. यावेळी दत्तात्रयने त्याला माहिती देत म्हटले की, मंगला आणि जगन्नाथ दोघे रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न अवस्थेत पडले आहेत.सूरज टेंभरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची कार्यवाही

देहूरोड पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून दत्तात्रयवर संशय घेत तपास सुरू केला.तो मूळ गावी पळून जात असल्याचे समजताच पोलिसांनी एक तासात चिखली येथून त्याला अटक केली.चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे व सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृत महिलेचं वैयक्तिक जीवन

मंगला यांचे पहिले लग्न झाले होते आणि त्या विवाहातून त्यांना दोन मुले होती. २०१८ साली पतीच्या निधनानंतर त्यांनी सूरज टेंभरे यांच्याशी दुसरे लग्न केले.तळवडे परिसरात मजुरी करत असताना मंगला यांचे प्रथम जगन्नाथसोबत आणि नंतर दत्तात्रयसोबत प्रेमसंबंध जुळले.

घरच्यांचे प्रयत्न निष्फळ

मंगळवारी रात्री मंगला आणि जगन्नाथ नेहमीप्रमाणे दारू पित होते. पती सूरज यांनी तिला घरी बोलवण्यासाठी गेले, पण तिने नकार दिला. त्यांनी मुलगा अनिललाही तिला बोलवायला पाठवले, तरी ती आली नाही.रात्री झोपेच्या दरम्यानच दत्तात्रयने दोघांना ‘नको त्या अवस्थेत’ पाहून रागाच्या भरात दोघांचाही खून केला.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.