- Home
- Utility News
- Some People Always Look Sad : काही लोक नेहमीच दुःखी का दिसतात?, ही आहेत यामागे मानसिक कारणं
Some People Always Look Sad : काही लोक नेहमीच दुःखी का दिसतात?, ही आहेत यामागे मानसिक कारणं
Some People Always Look Sad : आपल्या आजूबाजूला काही लोकांच्या चेहऱ्यावर हास्यापेक्षा दुःखच जास्त दिसतं. त्यांना पाहिल्यावर 'यांना काय झालंय?' 'हे असे का आहेत?' असं वाटतं. पण त्या रडक्या चेहऱ्यामागे खरं काय आहे? मानसशास्त्र काय सांगतं ते पाहूया.

मनातल्या भावनाच चेहऱ्यावर व्यक्त होतात -
काही लोक नेहमी रडका चेहरा करून एक प्रकारचं दुःख किंवा ओझं बाळगल्यासारखे दिसतात. त्यांना पाहिल्यावर, 'हे इतके नकारात्मक का आहेत?' अशी शंका येते. पण मानसशास्त्रानुसार, ही केवळ सवय किंवा नाटक नाही. यामागे खोल मानसिक कारणं आहेत. व्यक्तीच्या मनात चाललेल्या भावनाच चेहऱ्यावर व्यक्त होतात.
वेदना आत लपवल्या की असं होतं -
अशी मानसिकता तयार होण्यासाठी बालपणीचे अनुभव महत्त्वाचे असतात. प्रेम, सुरक्षितता नसलेल्या कुटुंबात वाढलेली मुलं आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. वारंवार होणारा अपमान, टीका, दुर्लक्ष यामुळे ते वेदना आत लपवायला शिकतात. हीच वेदना कायमचं दुःख बनून रडक्या चेहऱ्याच्या रूपात दिसते.
'मी कोणालाच नको' ही भावना -
असे लोक सहसा भविष्याबद्दल घाबरलेले असतात. वाईटच होईल असा विचार करतात. छोटी समस्याही त्यांना मोठं ओझं वाटते. यामुळे चेहऱ्यावर थकवा आणि दुःख दिसतं. भूतकाळातील वेदना, अपमान, निराशा त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. 'मी कोणालाच नको' ही भावना त्यांच्यात प्रबळ असते.
दुःख लपवणं शक्य होत नाही -
काही लोक स्वभावाने खूप संवेदनशील मनाचे असतात. इतरांचे बोलणे, पाहणे, वागणे याचा त्यांच्यावर खोल परिणाम होतो. इतरांच्या लक्षात न येणाऱ्या गोष्टीही त्यांना दुःख देतात. भावनांना जास्त प्रतिसाद देणारे हे लोक आपलं दुःख लपवू शकत नाहीत आणि ते चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं.
मौन संघर्षाने मन थकून जातं -
सगळ्यांसमोर 'रडायचं नाही' ही भावना प्रबळ असल्यामुळे अनेकजण आपल्या वेदना व्यक्त करत नाहीत. वेदना सांगणं हे अशक्तपणाचं लक्षण आहे असं समजून ते आतल्या आत कुढत राहतात. हा मूक संघर्ष मनाला थकवतो. तोच थकवा चेहऱ्यावर दुःख आणि निराशेच्या रूपात दिसतो.
स्वतःचे रक्षण करण्याची एक पद्धत -
मानसशास्त्रज्ञांच्या मते, काहीजण मुद्दाम दुःखी दिसण्याचा प्रयत्न करतात. असं दिसल्यास इतर लोक जास्त अपेक्षा ठेवत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत, जबाबदारी देत नाहीत. ही स्वतःचे रक्षण करण्याची एक पद्धत आहे. पण यामुळे एकटेपणा वाढतो आणि नाती दुरावतात.
गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या -
या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, आधी आपल्या भावना स्वीकारणं महत्त्वाचं आहे. विश्वासू व्यक्तींशी बोलल्याने मन हलकं होतं. गरज वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं उत्तम. चांगली झोप, शारीरिक हालचाल, आवडतं काम केल्याने भावनिक संतुलन सुधारतं.

