- Home
- Mumbai
- ठाणे-मुलुंडकरांसाठी मोठी गुड न्यूज! नव्या रेल्वे स्टेशनला २५० कोटींचा निधी मंजूर; 'हे' नाव देण्याची आग्रही मागणी
ठाणे-मुलुंडकरांसाठी मोठी गुड न्यूज! नव्या रेल्वे स्टेशनला २५० कोटींचा निधी मंजूर; 'हे' नाव देण्याची आग्रही मागणी
New railway station between Thane and Mulund: ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २५० कोटीचा निधी मंजूर केला. खासदार नरेश म्हस्के यांनी या स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

ठाणे-मुलुंडकरांसाठी मोठी गुड न्यूज! नव्या रेल्वे स्टेशनला २५० कोटींचा निधी मंजूर
ठाणे: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः ठाणे आणि मुलुंडकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ठाणे-मुलुंड दरम्यानच्या 'नव्या रेल्वे स्थानका'च्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच या स्थानकाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
'धर्मवीर आनंद दिघे' स्थानक? नावावरून संसदेत चर्चा
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत या नव्या स्थानकाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, या नियोजित स्थानकाला ठाण्याचे लोकनेते 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ठाणे स्थानकावरील गर्दीचा भार हलका होणार
मध्य रेल्वेवरील ठाणे हे सर्वात गजबजलेले स्थानक मानले जाते. येथे दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. ट्रान्स हार्बर मार्ग आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे या स्थानकावर प्रचंड ताण येतो. नव्या स्थानकामुळे होणारे फायदे
गर्दीचे विभाजन: ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवाशांची संख्या विभागली जाईल.
प्रवास सुखकर: पीक अवर्समध्ये लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी कसरत कमी होईल.
कनेक्टिव्हिटी: ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील २५ लाखांहून अधिक लोकसंख्येला या सुविधेचा थेट लाभ मिळेल.
प्रकल्पाची सद्यस्थिती
रेल्वे मंत्र्यांनी निधीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. बोर्डाची मोहर उमटताच बांधकामाला सुरुवात होईल, ज्यामुळे ठाणेकरांचा दररोजचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

