Mumbai to JNPA e-speed boat service: मुंबई ते जेएनपीए दरम्यान लवकरच 'ई-स्पीड बोट' सेवा सुरू होत आहे, ज्याच्या अंतिम चाचण्या या आठवड्यात पूर्ण होतील. ही हायटेक जलवाहतूक सेवा प्रवाशांसाठी लवकरच खुली केली जाणार आहे.
मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासाला आता हायटेक वेग मिळणार आहे. लोकल, मेट्रो आणि मोनोरेलनंतर आता मुंबई ते जेएनपीए (JNPA) दरम्यान धावणारी 'ई-स्पीड बोट' सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. या जलद जलवाहतुकीमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून, याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
चाचण्यांचा अखेरचा टप्पा सुरू
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा अद्याप प्रत्यक्ष सुरू झाली नव्हती. मात्र, आता प्रतिक्षा संपली आहे. जेएनपीएचे जलवाहतूक नियंत्रक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवडाभरात बोटींच्या अंतिम चाचण्या पूर्ण केल्या जातील. या महिन्यात एक विशेष प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर तातडीने ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल.
चाचणीत नेमके काय तपासले जाणार?
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीप्रमाणेच या बोटींच्याही कडक चाचण्या घेतल्या जात आहेत.
वेग (Speed): समुद्रातील लाटांचा विचार करून बोटीचा प्रत्यक्ष वेग तपासला जाईल.
क्षमता (Capacity): एकावेळी किती प्रवासी सुलभपणे प्रवास करू शकतील, याचे मोजमाप होईल.
तांत्रिक सुरक्षा: भविष्यात प्रवासादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी इंजिन आणि बॅटरी बॅकअपची तपासणी केली जाईल.
कुणाला होणार सर्वाधिक फायदा?
मुंबईहून जेएनपीए बंदरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी जातात. सध्या या कर्मचाऱ्यांना लाकडी बोटींचा आधार घ्यावा लागतो, जो अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक पर्याय आहे. ई-स्पीड बोट सुरू झाल्यामुळे
१. प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होईल.
२. प्रवासाचा खर्च खिशाला परवडणारा असेल.
३. लाकडी बोटींच्या तुलनेत हा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी असेल.


