CM देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महामुंबईसाठी एक मोठा विकास आराखडा सादर केला आहे. या योजनेत झोपडपट्टी पुनर्विकासातून १० लाख घरे, उत्तन ते विरार सागरी सेतू आणि 'तिसरी' व 'चौथी मुंबई' यांसारख्या नवीन शहरांच्या निर्मितीचा समावेश आहे.
मुंबई: मुंबईकरांचे 'हक्काच्या घराचे' स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महामुंबईच्या कायापालटाचा महाभयंकर (Mega Plan) आराखडा सादर केला आहे. झोपडपट्टी पुनर्विकासापासून ते थेट समुद्रातून धावणाऱ्या सागरी सेतूंपर्यंत, मुंबई आता जागतिक दर्जाचे शहर बनण्याच्या दिशेने सज्ज झाली आहे.
१० लाख घरे आणि 'नो न्यू स्लम' पॉलिसी
मुंबईतील झोपडपट्ट्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
मोठा निर्णय: मुंबईतील सुमारे २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास करून नागरिकांसाठी १० लाख परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातील.
हायटेक पाळत: मुंबईत पुन्हा नवीन झोपड्या उभ्या राहू नयेत यासाठी GIS (Geographic Information System) आधारित मॅपिंगचा वापर केला जाईल. 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क'मुळे शहराच्या नियोजित विकासाला गती मिळेल.
समुद्रातून प्रवास, उत्तन ते विरार सागरी सेतू
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ५८,७५४ कोटी रुपयांच्या उत्तन ते विरार सागरी सेतूची घोषणा केली आहे. हा मार्ग थेट मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाला जोडला जाईल.
अटल सेतू अपडेट: अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडणारा 'उलवे किनारी मार्ग' जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होईल.
शिवडी-वरळी उन्नत मार्ग: सप्टेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग खुला करण्याचे लक्ष्य आहे.
तिसरी आणि 'चौथी मुंबई'चा जन्म!
मुंबईचा विस्तार आता केवळ उपनगरांपुरता मर्यादित नाही. सरकारने दोन नवीन शहरांची घोषणा केली आहे.
तिसरी मुंबई: अटल सेतूच्या (MTHL) परिसरात हे आधुनिक शहर वसले जाईल.
चौथी मुंबई: पालघरमधील वाढवण बंदर परिसरात नवीन औद्योगिक आणि निवासी केंद्र विकसित होईल.
उद्दिष्ट: २०३० पर्यंत महामुंबईची अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरवर नेणे.
मेट्रो आणि भुयारी मार्गांचे जाळे
मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारने तिजोरी खुली केली आहे.
मेट्रो-११ (वडाळा ते गेटवे): २३,४८७ कोटींचा भूमिगत प्रकल्प.
मेट्रो-८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ): २२,८६२ कोटींची तरतूद.
भुयारी मार्ग: ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दरम्यानचा हायटेक भुयारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होईल.
येत्या ५ वर्षांत मुंबईत राहणे, फिरणे आणि व्यवसाय करणे पूर्णपणे बदलणार आहे. मुंबई आता खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' मोडमध्ये आहे!


