Mumbai Rains : मुंबईत पावसाचा कहर! पुढचे २४ तास धोक्याचे, कोकणातही अतिवृष्टीचा इशारा!
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशातच पुढील 24 तासही धोक्याचे असून हवामान खात्याने काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आजचे हवामान खात्याचे ताजे अपडेट्स

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यातल्या पश्चिम किनारपट्टीवर मागच्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज २६ जुलै रोजीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांना पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात सलग दुसऱ्या दिवशी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, पालघर जिल्ह्यात 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील पावसाचा अंदाज
मुंबईत आज दिवसभरात काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. आकाश ढगाळ राहणार असून समुद्रात लाटांची उंची तब्बल ४.६७ मीटरपर्यंत जाऊ शकते. विशेषतः दुपारनंतर जोरदार सरींचा अंदाज असल्याने वाहतूक आणि जलवाहिनी व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई आणि ठाण्यातील स्थिती
नवी मुंबई आणि ठाणे या भागांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे. दोन्ही शहरांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर खड्डे आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना फक्त अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पालघरमध्ये 'रेड अलर्ट'
पालघर जिल्ह्यात हवामान खात्यानं 'रेड अलर्ट' जारी केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पूरपरिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.
कोकणातील पावासाचा अंदाज
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्येही गेल्या आठवड्यापासून 'ऑरेंज अलर्ट' आहे. विशेषतः सिंधुदुर्गात काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलन किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनानं सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

