Mumbai Monsoon Update : मुंबईत पाऊस कधी पडणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात नवा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय शहरात साधारण कधीपर्यंत पावसाचे आगमन होईल याच्या तारखेची शक्यता देखील व्यक्त केली आहे.

Mumbai Monsoon Update : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा अंदाजात बदल केला असून, मुंबईतील मान्सूनचे आगमन जूनच्या अखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सामान्यतः ११ जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून यंदा जवळपास दोन आठवडे उशिरा येण्याची चिन्हे दिसत असल्याने हवामान खात्याने म्हटले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मान्सूनची वाटचाल मंदावली

देशाच्या काही भागांमध्ये मान्सूनने लवकर हजेरी लावली असली तरी पश्चिम भारतात त्याचा वेग सध्या मंदावला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीकडे सरकण्यासाठी आवश्यक असलेले आर्द्र वारे पुरेशा ताकदीने सक्रिय नसल्याने मान्सून पुढे सरकरण्यास वेळ लागत आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना पावसाची अजून प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

२० जूननंतर परिस्थितीत बदलाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २० ते २१ जूनदरम्यान अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या हालचालींना पुन्हा गती मिळू शकते. या बदलामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार मुंबईत २५ जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो.

वर्ष २०१९ आणि वर्ष २०२३ सारखी परिस्थिती

यापूर्वी वर्ष २०१९ आणि वर्ष २०२३ या दोन वर्षांमध्ये देखील मुंबईत मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. यंदाही परिस्थिती त्याच दिशेने जात असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण

मान्सून लांबल्यामुळे मुंबईत दिवसासह रात्रीचे तापमानही वाढलेले आहे. अनेक हवामान केंद्रांवर जून महिन्यातील सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची नोंद झाली आहे. पावसाच्या विलंबामुळे वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता कायम असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.

उशिरा येणारा मान्सून म्हणजे कमी पाऊस?

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचे आगमन उशिरा झाले म्हणून दमदार पाऊस होणारच नाही असे नव्हे. यापूर्वी अनेक वर्षांमध्ये मान्सून उशिरा आला असला तरी नंतर सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.