मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, त्यांना पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती पाळाव्या लागतील.

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलनासाठी केलेल्या मागणीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी ही परवानगी दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रमुख अटी व शर्ती:

  • स्थळ व वेळ : आंदोलन फक्त आझाद मैदानातील राखीव जागेतच करता येईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन करण्याची मुभा असेल. ठरलेल्या वेळेनंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
  • आंदोलकांची संख्या : जास्तीत जास्त ५,००० आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. मैदानाचा राखीव भाग साधारण ७,००० चौ. मीटर असून ही जागा ५,००० लोकांना पुरेशी ठरेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
  • वाहतूक व्यवस्थापन : आंदोलकांची वाहने मुंबईत आल्यानंतर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंतच येऊ शकतील. त्यानंतर नेत्यांसोबतची केवळ ५ वाहने आझाद मैदानापर्यंत जाऊ शकतील. उर्वरित वाहने शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील. गणेशोत्सव काळात वाहतुकीत अडथळा होऊ नये, यासाठी हे नियम घालण्यात आले आहेत.

इतर अटी :

  1. आंदोलनाला फक्त एका दिवसाचीच परवानगी असेल.
  2. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनास मुभा मिळणार नाही.
  3. परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वा मोठ्या आवाजाची साधने वापरता येणार नाहीत.
  4. आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे कडक मनाई आहे.
  5. लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्धांना आंदोलनात सहभागी करू नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.