मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी अंतरवली सराटी येथे समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मोर्चा मुंबईला नेणार असल्याचे सांगितले. 

अंतरवली सराटी (जालना) : मराठा आरक्षणासाठी आता थांबायचं नाही, थेट मुंबईकडे शांततेत मोर्चा घेऊन जायचं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलं. सरकार जाणीवपूर्वक मोर्चा अडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पण, कुठल्याही परिस्थितीत मुंबई गाठायचीच, असंही त्यांनी ठाम सांगितलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, कितीही चिथावलं तरी शांत राहायचं. दगडफेक, हिंसाचार अजिबात करायचा नाही. आम्ही हक्क मागायला जात आहोत, दंगा करायला नाही.

मग आमची अडवणूक का करता?

त्यांनी सरकारवर हिंदूविरोधी काम करण्याचा आरोप केला आणि पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी बसवलं, जेणेकरून सणांच्या दिवशी हिंदूंना त्रास होईल, असा सवालही केला.

गणेशोत्सवाच्या नावाखाली सरकारने मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी म्हटलं. पण आमच्या लढ्याला दलित, मुस्लीम, ओबीसी अशा सर्व समाजांचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोर्चाचा कार्यक्रम:

बुधवारी सकाळी 10 वाजता अंतरवली सराटीतून मोर्चा निघणार. आजचा मुक्काम जुन्नर येथे असेल. पुढील मार्ग: राजगुरुनगर → खेड → चाकण → तळेगाव → लोणावळा → पनवेल → वाशी → चेंबूर. 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचायचं नियोजन होतं. पण, मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन बंदी घातली आहे. त्यामुळे आता कोर्टाकडून काय निर्णय येतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मोर्चाची तयारी:

अंतरवली सराटीत मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. गावोगावी समर्थन दिलं जात आहे. मसाजोग गावातूनसुद्धा अनेक गाड्या आंदोलकांसह रवाना झाल्या. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावानेही जरांगेंना पाठिंबा दिला.

जालना पोलिसांच्या 40 अटींवर परवानगी:

मोर्चासाठी पोलिसांनी मनोज जरांगेंना परवानगी दिली, पण 40 अटी लादल्या. त्यातील प्रमुख अटी अशा –

  1. कुठल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तेढ पसरवणारी विधाने करू नयेत.
  2. मोर्चाचा मार्ग जाहीर केल्याप्रमाणेच राहील, बदलणार नाही.
  3. अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड, वाहतूक यांना अडथळा होणार नाही.
  4. खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास जबाबदारी आयोजकांवर असेल.
  5. मोर्चात कुणीही शस्त्र, दगड, ज्वलनशील वस्तू बाळगणार नाही.