दादर कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाला. महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री आणि बांबू काढून टाकले. न्यायालयाच्या आदेशाविरोधात जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसले.
मुंबई : 6 ऑगस्ट रोजी दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जैन समाजाने कबुतरखान्यावर बांधलेली ताडपत्री स्वतः हटवली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री काढली आणि बांबूही फोडून टाकले. जैन समाजाच्या या कृतीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
उच्च न्यायालयाचा आदेश आणि महापालिकेची कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आजार पसरत असल्याने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, मुंबई महापालिकेने कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालून ताडपत्री लावून कबुतरखाना बंद केला होता. मात्र, या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवला.
कबुतरखाना बंदीमागील कारणे
दादर रेल्वे स्थानकाजवळ असलेला कबुतरखाना हे त्या परिसराचं वैशिष्ट्य ठरलं होतं. मात्र, प्रचंड कबुतरांमुळे त्या भागात श्वसनाचे विकार, पिसांचा त्रास आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ही व्यवस्था हटवण्याची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर महत्त्वाचे निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न देणे हा "सार्वजनिक उपद्रव" असल्याचे ठरवत महापालिकेला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचेही निर्देश दिले गेले.
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि मंत्रिमंडळाची बैठक
कबुतरखाना बंद करण्याच्या कारवाईनंतर जैन समाजाने आंदोलन केल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी सांगितले की, दादर कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत "कंट्रोल फीडिंग" सुरू ठेवावं. तसेच गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कबुतरांमुळे आरोग्याला धोका
कबुतरांमुळे मानवांमध्ये झुनोटिक (प्राण्यांकडून मानवात पसरणारे) आजार पसरतात, जसे की:
- क्रिप्टोकोकोसिस
- हिस्टोप्लाज्मोसिस
- सायटाकोसिस
- साल्मोनेलोसिस
- टॉक्सोप्लाज्मोसिस
- एव्हीयन माइट इन्फेस्टेशन
हे आजार कबुतरांच्या विष्ठा, पिसे, आणि शरीरातील सूक्ष्म धुळीच्या कणांमुळे पसरतात.


