Devendra Fadnavis on Bishnoi Gang : बिष्णोई गँग धनिकांना खंडणीसाठी फोन करुन त्यांना धमकी देते. त्यानंतर त्यांच्या घराबाहेर गोळीबार केला जातो. या संपूर्ण गँगबाबत मुख्यमंत्र्यांनी ही गँग कशाप्रकारे काम करते याची माहिती दिली. 

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबईत बिष्णोई गँगने मोठी दहशत माजवली आहे. ही गँग नेमकी कशी काम करते, धनिक लोकांना घाबरुन कशाप्रकारे खंडणी गोळा करते आणि मुंबई पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्या मुसक्या कशा आवळल्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. या गँगवर केलेल्या कारवाईबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांचंही कौतुक केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमंक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'पोलिसांनी चांगली कारवाई करुन अनमोल बिष्णोईला अटक केली आहे. तो जेलमध्ये आहे. प्रविण लोणकरलाही अटक केली आहे. याचे भाऊ बाहेर परदेशात आहेत. ते लोक व्हीपीएनच्या फोनने ते खंडणीसाठी फोन करतात, धमकी देतात. धमकी दिल्यानंतर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही, तर ते सोडून देतात. ही गँग पाच-सहा लोकांना फोन करते. या खंडणीच्या फोननंतर एखादा समोरचा घाबरलेला असतो, त्याच्या घरासमोर किंवा दुकानासमोर यूपीतील भाड्याच्या गुंडांना ही गँग गोळीबार करायला सांगते. हे लोक त्या व्यक्तीवर गोळीबार करत नाही, बाहेर करतात. यामागे कारण असं असतं, की त्या व्यक्तीने घाबरून मागितलेली खंडणी द्यावी. आतापर्यंत ज्या-ज्या भाड्याच्या गुंडांनी असे हल्ले केले, त्या-त्या ठिकाणच्या गुंडांना शोधून पकडण्यात आलं आहे. हे सर्व भाडोत्री गुंड निघाले, ते पैसे घेऊन हे काम करत होते', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, 'आता अशाप्रकारे खंडणीचा कोणालाही फोन आला, तर त्यांना सांगतो काळजी करू नका, हे शूर-वीर लोक नाहीत. जे लोक घाबरले त्यांच्याकडून पैसे, खंडणी ते घेणार. त्यांच्याकडून व्हीपीएनद्वारे फोन केले जातात, मात्र पोलिसांकडून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. ही गँग एकाच देशातून नाही, तर तीन-चार देशातून मास्कींग करुन हा फोन आपल्याकडे करते, त्यामुळे हा फोन नेमका कुठून आला हे शोधणं कठीण जातं, पण ते आता आपण शोधून काढतो आहे.'

'ही आधी एक गँग होती. मात्र या गँगचे आका जेलमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता या एका गँगच्या दोन गँग झाल्या आहेत. आरजू बिष्णोई आणि रोहित गोद्रा असे दोन जणं वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण यांनाही लवकरच शोधून काढलं जाईल, तसंच या भाड्याने येणाऱ्या गुंडांचाही बंदोबस्त केला जाईल', असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

YouTube video player

'रोहित शेट्टी यांच्या घरावर हल्ला केलेल्यांना मोका लावला, त्यांना शोधून जेलमध्ये टाकलं आहे. आपल्याकडे अशी टीम आहे, मुंबई पोलिसांचं काम अतिशय चांगलं आहे, अशा लोकांना शोधून काढण्यात मुंबई पोलीस एक्सपर्ट आहेत, दोन बिष्णोई पकडले आहेत. आता त्यांचा तिसरा भाऊ हे काम करतो. ही गँग केवळ आपल्याच राज्यात नाही, तर इतरही राज्यात अशी कामं करते. या बाहेरुन ऑपरेट करणाऱ्या गँगला कशाप्रकारे परत आणायचं हा प्रयत्न सुरू आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.