Winter Session Nagpur 2025 : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात BJP आमदार IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत. नागपूरमध्ये आयुक्त असताना त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा नियमबाह्य प्रभार घेतल्यासह अन्य काही कारणे आहेत. 

Winter Session Nagpur 2025 : राज्यातील ख्यातनाम आणि धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात BJP आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडण्याची तयारी करत आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी शासनाची औपचारिक नियुक्ती नसतानाही ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’चा प्रभार आपल्या हातात घेतल्याचा भाजपा आमदारांचा आरोप आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी सभागृहात करण्यात येणार आहे.

भाजपाचे नेमके आरोप कोणते? (BJP Allegations Against Tukaram Mundhe)

BJP ने तुकाराम मुंढे यांच्यावर तीन गंभीर आरोप पुन्हा अधिवेशनात समोर आणले आहेत—

  • स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक नसताना अधिकार वापरत काही 'जवळच्या' कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य पेमेंट्स केली.
  • काही महिला अधिकाऱ्यांना दबाव टाकून काम करून घेतल्याचे आरोप नोंदवले गेले.
  • दोन्ही प्रकरणांवर तेव्हा एफआयआर दाखल झाले होते; परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राजकीय दबावामुळे कारवाई थांबली असल्याचा आरोप BJP ने पुन्हा सक्रिय केला आहे. या आरोपांच्या आधारे BJP आता तुकाराम मुंढे यांचे निलंबन करण्याची जोरदार मागणी करणार आहे.

धडाडीचे अधिकारी की राजकारण्यांसाठी डोकेदुखी?

राज्यातील प्रशासनात तुकाराम मुंढे हे नियमपालनासाठी ओळखले जातात. कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न झुकता काम करणाऱ्या मुंढेंची प्रतिमा मजबूत असली तरी, त्यांच्या कठोर स्वभावामुळे राजकीय नेत्यांना ते अनेकदा 'न झेपणारे' अधिकारी मानले जातात. साधारणपणे अधिकारी ३ वर्षे एकाच पदावर राहतात; परंतु तुकाराम मुंढे यांची सरासरी कार्यकाल फक्त एका वर्षाचा राहिला आहे.

ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची पुन्हा बदली झाली असून त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. 2005 बॅचचे अधिकारी असलेल्या मुंढे यांच्या २० वर्षांच्या सेवेत २४ वेळा बदली झाली आहे—हे प्रशासनात एक विक्रमी उदाहरण मानले जाते.

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू (Maharashtra Winter Session 2025)

आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. यंदा प्रथमच दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय पार पडणार आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि शोकप्रस्ताव मांडले जाणार आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर पडतो का, अथवा काही नवे निर्णय जाहीर केले जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच तुकाराम मुंढे यांच्यावरील जुन्या प्रकरणांचा मुद्दा पुन्हा गरम होण्याची चिन्हे आहेत.