पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या मोठ्या जाऊ मयुरी हगवणे हिच्या आईने, लता जगताप यांनी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या मोठ्या जाऊ मयुरी हगवणे हिच्या आईने, लता जगताप यांनी, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात मयुरीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाची माहिती देण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे पत्र सार्वजनिक करून, आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

लता जगताप यांच्या पत्रात म्हटले आहे की, मयुरीला मुलगा न झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून "मुलगा होत नाही तर आमच्याकडे येऊ नकोस" असे सांगण्यात आले. तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि तिच्या सासऱ्यांनी तिच्या छातीजवळ हात लावून कपडे फाडले, असेही आरोप आहेत. या प्रकरणात मयुरीच्या भावाने देखील आयोगाकडे तक्रार केली होती.

अंजली दमानिया यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत, "वैष्णवीचा जीव वाचवता आला असता का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका केली आहे. या प्रकरणामुळे महिला आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पूर्वीच छळाची माहिती असूनही योग्य ती कारवाई का झाली नाही, याचे उत्तर आयोगाने द्यावे, अशी मागणी होत आहे.