उल्हासनगरमधील एका व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.पण अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना व्यक्ती जीवंत झाल्याचा चमत्कार घडला आहे.

उल्हासनगरमधून एक धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय अभिमान तायडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचा प्रकार समोर आला असून, त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते जिवंत असल्याचे लक्षात आले. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचं अत्यंत गंभीर उदाहरण ठरत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मृत घोषित करून दिलं डेथ सर्टिफिकेट

अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून खालावलेली होती. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने उल्हासनगर येथील एका रुग्णालयात आणलं. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रिक्षामधील तपासणीतच त्यांना मृत घोषित केलं आणि थेट डेथ सर्टिफिकेटही दिलं.

अंत्यसंस्काराची तयारी

डॉक्टरांच्या मृत्यू घोषणेनंतर कुटुंबीय अभिमान तायडे यांना घरी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पण त्याचवेळी एका नातेवाईकाच्या लक्षात आलं की, त्यांच्या छातीत अजूनही धडधड आहे. त्यांनी त्वरीत दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्यांना पुन्हा शुद्धीवर आणलं. नातेवाईकांना सुटकेचा नि:श्वास सोडावा लागला.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा?

या घटनेनंतर संबंधित डॉक्टरांनी चूक मान्य केली आहे. त्यांनी सांगितलं की रुग्णाची नस मिळाली नाही आणि आजूबाजूच्या गोंगाटामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, त्यामुळे चुकून मृत घोषित झालं. त्यांनी या निष्काळजीपणाबद्दल खेदही व्यक्त केला.

निष्काळजी डॉक्टरांवर काय कारवाई?

ही घटना समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील नियमन व जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका जिवंत माणसाला मृत घोषित करून त्याच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांविरोधात काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.