पुण्यात अर्धवट जळालेले तीन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामधअे दोन लहान मुलांसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नक्की प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया.

Pune News : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसह तिच्या दोन चिमुरड्यांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर आली असून, तिघांचेही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पुण्यातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या रांजणगावजवळील खंडाळे गावाच्या परिसरात ही घटना घडली. महामार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामस्थांना तीन मृतदेह आढळून आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक पोलीस पाटलांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहणी केली असता, मृतदेह एका तरुणीचा आणि दोन लहान मुलांचा असल्याचे स्पष्ट झाले. तिघांचेही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते.

मयत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे दरम्यान असून, एका मुलाचे वय तीन ते चार वर्षे तर दुसऱ्या मुलाचे वय दोन ते तीन वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे तिघे जिवंत असताना जाळले गेले की हत्या करून त्यानंतर जाळले गेले, याचा उलगडा शवविच्छेदनानंतर होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची गांभीर्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींचीही माहिती घेतली जात आहे.

या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकाच वेळी तिघांचा अमानुष खून झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीस विभागाने घटनेचा गंभीरतेने तपास सुरु केला असून लवकरच गुन्हेगाराचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.