- Home
- Maharashtra
- गॅस सिलिंडरसाठी आता नवी वेटिंग लिस्ट! मुंबई-पुण्यात २५ दिवसांचा नियम; ग्रामीण भागासाठी काय आहे निर्णय?
गॅस सिलिंडरसाठी आता नवी वेटिंग लिस्ट! मुंबई-पुण्यात २५ दिवसांचा नियम; ग्रामीण भागासाठी काय आहे निर्णय?
LPG cylinder new booking rules: जागतिक तणावामुळे गॅस साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, शहरी भागात आता २५ दिवसांनी तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी सिलिंडर मिळणार आहे.

गॅस सिलिंडरसाठी आता नवी वेटिंग लिस्ट!
मुंबई: सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली गॅस टंचाई आणि होणारी साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, गॅस वितरणाबाबत नवी नियमावली (New LPG Rules) जाहीर केली आहे.
काय आहे नवा नियम? 'इतक्या' दिवसांनंतरच मिळणार सिलिंडर
वाढती मागणी आणि पुरवठ्यावर आलेला ताण लक्षात घेता, ऑनलाईन बुकिंगच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
शहरी भाग (मुंबई, पुणे इ.): आता घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी २१ दिवसांऐवजी २५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
ग्रामीण व दुर्गम भाग: ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा प्रतीक्षा कालावधी ४५ दिवसांचा असेल.
काळाबाजाराला चाप आणि व्यावसायिक विक्रीवर निर्बंध
युद्धाच्या अफवांचा फायदा घेत व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. २ हजारांचा कमर्शियल सिलिंडर थेट ४ हजारांपर्यंत पोहोचल्याने सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सध्या व्यावसायिक सिलिंडरच्या विक्रीवर काही प्रमाणात मर्यादा आणल्या असून, घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये; ४० दिवसांचा स्टॉक शिल्लक
गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर लागणाऱ्या ८-८ तासांच्या रांगा आणि ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारताकडे सध्या ४० दिवस पुरेल इतका एलपीजीचा बफर स्टॉक उपलब्ध आहे.
पुरवठ्यासाठी भारत आता केवळ मध्यपूर्वेतील देशांवर अवलंबून न राहता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून गॅस आयात करण्याच्या तयारीत आहे.
बुकिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय केवळ साठेबाजी (Hoarding) रोखण्यासाठी घेण्यात आला आहे, टंचाईमुळे नाही.
गॅसचा मुबलक पुरवठा सुरू, ग्राहकांनी विनाकारण साठेबाजी करू नये
"गॅसचा मुबलक पुरवठा सुरू आहे, त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण साठेबाजी करू नये," असे आवाहन वितरकांकडून करण्यात आले आहे.

