नागपुरात 18 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'रामरक्षा आंदोलन' होणार आहे. यालाच प्रतिउत्तर म्हणून भाजपा महायज्ञ करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : नागपुरात 18 जुलै रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 'रामरक्षा आंदोलन' होणार आहे. अशातच भाजपाकडून उबाठाच्या आंदोलनानंतर अवघ्या चार दिवसांनी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 56 वा वाढदिवस आहे. नागपुरातील रामनगर परिसरातील मंदिरात भाजपाचा हा महायज्ञ पार पडणार आहे. त्यामुळे उपराजधानीतील धार्मिक आणि राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

18 जुलैला ठाकरे गटाचे 'रामरक्षा आंदोलन'

अयोध्या राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात 'रामरक्षा आंदोलन' करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते संदीप जोशी यांच्या पुढाकाराने रामनगर येथे महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञामध्ये विविध समाजघटकांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

'भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न'

भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही करण्यात आली. "भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे," अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते नागपुरातील विविध मंदिरांची पाहणी करून आंदोलनाची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

नागपुरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

रामरक्षा आंदोलन आणि त्यानंतर होणारा महायज्ञ यामुळे नागपुरात धार्मिक आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही कार्यक्रमांमुळे उपराजधानीत राजकीय शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.