Maharashtra Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काही भागांमध्ये अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामानातील अस्थिरता वाढली आहे. 

Maharashtra Weather Update : राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला जोरदार पावसानंतर वातावरण कोरडं झालं होतं. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा पावसाने अचानक हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असताना, काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हवामानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जानेवारीतही पावसाची शक्यता कायम

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यातही राज्यातून पाऊस पूर्णपणे जाण्याची शक्यता नाही. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून संपूर्ण जानेवारीत कमी-अधिक प्रमाणात पावसाची स्थिती कायम राहू शकते.

उत्तर भारतात पावसाचा इशारा

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद आणि बिजनौर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, 2 ते 5 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये पावसासह काही भागांत गारपीठ होण्याचीही शक्यता आहे.

दक्षिण भारतात अतिमुसळधार पावसाचा धोका

दक्षिण भारतातही हवामान अस्थिर असून तामिळनाडूच्या काही भागांमध्ये 2 आणि 3 जानेवारी रोजी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका वाढला

दरम्यान, मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या प्रदूषणावर न्यायालयांनीही चिंता व्यक्त केली असून महापालिकांना फटकारे दिले आहेत. हवामानातील बदल आणि प्रदूषण यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.