राज्य परिवहन महामंडळाच्या 57 व्या राज्यव्यापी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. मंत्री भरत गोगावलेंच्या '२ चपटी प्या' या विधानाने वाद निर्माण झाला, तर महिला कर्मचाऱ्यांना रात्री 8 नंतर ड्युटी न लावण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली.
रायगड: राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेचं 57वं राज्यव्यापी अधिवेशन रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडलं. या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली. सरकारकडून योग्य निर्णय न झाल्यास संपाचा इशाराही कामगार संघटनेने दिला. अधिवेशनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे हे प्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्र्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करत रात्री ८ नंतर ड्युटी न लावण्याचे निर्देश दिले, तर भरत गोगावलेंनी दिलेला "एक चपटी नाही, दोन प्या!" हा सल्ला विशेष गाजला.
भरत गोगावले काय म्हणाले?
अपघातांची वाढती संख्या, विशेषतः चालकांच्या मद्यपानामुळे होणाऱ्या घटनांचा उल्लेख करत गोगावले म्हणाले, "ड्युटीदरम्यान नका पिऊ... पण ड्युटी संपल्यानंतर एक ऐवजी दोन चपटी प्या, कोण अडवतंय?" या विधानावर सभागृहात एकच कुजबूज झाली. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येतात, त्यामुळे जबाबदारीने वागणं गरजेचं आहे." त्यांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पावले उचलल्याचे सांगितले. तसेच, अजून काही सुविधा मिळणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेत, "रात्री ८ नंतर महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी लावली जाणार नाही," असे स्पष्ट निर्देश एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयाचं महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं असून, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांनी याबाबत निवेदन दिलं होतं.
कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक तक्रारी आणि अपेक्षा
कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना मांडल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "जर सरकार आमचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतकं करत असेल, तर आमचा कर्मचारी म्हणेल हेच सरकार परत निवडून द्या."
त्यांनी पुढील तक्रारीही अधिवेशनात मांडल्या
आरटीओकडून होणाऱ्या दंडवसुलीला आळा घालावा
किरकोळ कारणांवरून होणारी निलंबनाची कारवाई थांबवावी
काही अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन रोखावं
संदीप शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना ‘आपले उज्ज्वल निकम’ संबोधून विश्वास व्यक्त केला आणि एक दिलासादायक घोषणा अपेक्षित असल्याचं सांगितलं.
आश्वासनंही मिळाली, पण गोगावलेंच्या विधानावर खळबळ
या अधिवेशनात काही ठोस आश्वासनं मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहत असल्याचे संकेत मिळाले. मात्र, मंत्री भरत गोगावले यांचा "दोन चपटी" सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरत असून, या विधानावर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत.


