राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला गेला आहे. अशातच हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. तर येत्या काही दिवसांत ही स्थिती बदलून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय हवामान खात्याने अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसून येणार आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत जोरदार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

उद्याही काही जिल्ह्यांमध्ये कायम राहणार इशारा

19 जुलै रोजीदेखील राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. खासकरुन अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याचा अंदाज आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.