Maharashtra Weather Alert: पावसाचा कहर, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'
Maharashtra Weather Alert: श्रावण महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा जारी केला आहे.

मुंबई : श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही भागातील शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यापैकी 5 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' आणि 11 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
Heavy to Very Heavy rainfall with extremely Heavy rainfall very likely to occur at isolated places in Ghats areas of Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/7400Bbp2rk— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 17, 2025
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्ट
मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथेही 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असल्याने 'यलो अलर्ट' आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' असून, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
विदर्भातही पावसाचा तडाखा
विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

