मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषण सोडले असून, शासनाने अध्यादेश जाहीर केला आहे. ओबीसी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी समाधान व्यक्त केले आहे तर काहींनी टीका केली आहे.

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेले उपोषण सोडले आहे. मराठा आरक्षण मागताना ६ मागण्या पूर्ण झाल्या असून शासनाने अध्यादेश जाहीर केला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर यश मिळवल्याचे जाहीर करत असल्यामुळं गुलाल उधळला आहे. यावर आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्याचं दिसून आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ओबीसी समाजाचे अध्यक्ष काय म्हणाले? 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारच्या तोडग्यावर समाधान व्यक्त करताना तूर्तास ओबीसींचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी म्हटले. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदींची तपासणी करण्यासाठी सरकारने समिती तयार केली असून, जातीचे प्रमाणपत्र देताना काटेकोर चौकशी होणार असल्याने ओबीसींच्या हक्काला धक्का लागणार नाही, असं तायवडे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले? 

सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हा समाज जो आहे हा आर्थिकदृश्य मागास असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, परंतु हा समाज सामाजिक मागासलेला नाही असे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात अनेक मुख्यमंत्री झाले असून मराठा समाजाला मागास मानता येणार नाही.

ओबीसीला अजूनही लढावे लागत आहे महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले असून त्यांनी मराठा समाजाला मागास मानलेले नाही. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळते ते तर दिलेच, त्यापेक्षा अधिक देणे सुरु आहे. आम्हाला अजूनही वसतिगृहासाठी पैसे मागावे लागत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण हाके यांनी यावर मत व्यक्त केलं आहे.

हाके काय म्हटले आहे? 

राज्य सरकारने काढलेला मराठा आरक्षणाचा कालचा जीआर हा बेकायदेशीर आहे, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. सरकारला असा जीआर काढण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. हाकेंनी पुढे सांगितलं की, मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना मदत करणाऱ्या सर्व नेत्यांवर बहिष्कार टाकला जाईल. 

ओबीसी कार्यकर्त्यांशी चर्चा करून अशा नेत्यांची यादी तयार केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, ज्या बारामतीतून मनोज जरांगे गेलेत, त्याच बारामतीत आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच न्यायालयात आणि रस्त्यावर लढा देण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यावं, असं आवाहनही लक्ष्मण हाकेंनी केलं.