- Home
- Maharashtra
- Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; हवामान खात्याचा मोठा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात हवामानात मोठी उलथापालथ होत आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील ७ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' दिलाय, तर कोकणात तीव्र उकाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा 'अस्मानी' संकट! उन्हाच्या तडाख्यात ७ जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा
मुंबई: महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हात आता अवकाळी पावसाची भर पडणार असून, हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी राज्याचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. कोणत्या भागात छत्री सोबत ठेवावी लागेल आणि कुठे उन्हाचा चटका जाणवेल, जाणून घ्या
१. या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (वादळी पावसाचा इशारा)
पुढील २४ तासांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने खालील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे:
पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली आणि सोलापूर.
मराठवाडा: बीड आणि धाराशिव.
विदर्भ: चंद्रपूर आणि गडचिरोली.
२. कोकण आणि मुंबई, उकाड्याने अंगाची लाहीलाही
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता नसली, तरी दमट हवामानामुळे नागरिक हैराण होतील. मुंबईत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक तीव्र भासेल.
३. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, तापमानात वाढ
पुणे: पुण्यात हवामान कोरडे राहील, मात्र कमाल तापमान ३७ अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे.
नाशिक विभाग: नाशिक, जळगाव आणि धुळ्यात उन्हाचा चटका कायम असेल. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४. विदर्भ: 'हीट वेव्ह' आणि पावसाचा दुहेरी खेळ
विदर्भात विचित्र परिस्थिती पाहायला मिळणार आहे. अमरावती आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) यलो अलर्ट आहे, तर दुसरीकडे पूर्व विदर्भात पावसाची हजेरी लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी टीप
कापणीला आलेल्या पिकांची आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी मालाची साठवणूक करावी.

