काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबद्दल फेसबुक पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असून, महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून चर्चेत असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगत, त्यांनी तमाम शिवप्रेमींची फेसबुक पोस्टद्वारे मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त केली आहे.
"मी तुलना केलीच नाही!", सपकाळ यांचे स्पष्टीकरण
हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. माझ्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सरकारी कार्यालयांत महापुरुषांचे फोटो लावल्याने समाजात ऐक्य निर्माण व्हावे, हाच माझ्या विधानाचा मूळ उद्देश होता."
वक्तव्याचा नेमका संदर्भ काय?
सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
प्रेरणास्थान: टिपू सुलतानांनी महाराजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला, असे मी म्हटले होते, तुलना केली नव्हती.
संविधानाचा दाखला: भारताच्या मूळ संविधानातही टिपू सुलतानांची तसबीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक सलोखा: इतिहासावर मतभेद असू शकतात, पण त्यावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका होती.
भाजपवर डागली सडकून टीका
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असताना सपकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हा अपप्रचार करून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुण्यात झालेला प्रकार याच गलिच्छ राजकारणाचा भाग होता," अशी टीका त्यांनी केली. भाजपच्या या 'विकृती' विरोधात आपण लढत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आवाहन
दोन दिवसांवर आलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधत त्यांनी जनतेला आवाहन केले की, "कोणाच्याही भावना दुखावणं हा माझा हेतू नव्हता. माझ्या शब्दांचा गैरवापर झाल्यामुळे ज्या शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आपण सर्वांनी अपप्रचाराला बळी न पडता महाराजांनी दिलेला सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारावा."
सपकाळ यांनी आपल्या पोस्टचा शेवट संत तुकारामांच्या 'भले तरी देऊं कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणूं काठी' या प्रसिद्ध अभंगाने करत विरोधकांना इशाराही दिला आहे.


