चंद्रपूरने ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहराचा विक्रम केला आहे. उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते रिकामे, दुकाने बंद आणि शाळांमध्येही त्रासदायक परिस्थिती आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी, हिट स्ट्रोकची भीती वाढली आहे.

"तापमान नाही, हा थेट शारीरिक परीक्षा आहे!" असं म्हणत चंद्रपूरमधील रहिवासी शेखर पाटील आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसतात. चंद्रपूरनं सोमवारी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून विक्रम केला, पण इथं राहणाऱ्यांसाठी ही आकड्यांची बातमी नाही, तर जिवंत अनुभव आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रस्त्यावर शुकशुकाट, बाजारात सन्नाटा 

दुपारच्या वेळी चंद्रपूरच्या मुख्य बाजारात पाहायला मिळालं ते म्हणजे रिकामे रस्ते, बंद दुकाने आणि अंगावर पडणाऱ्या उन्हाने थबकलेली वाहतूक. फेरीवाल्यांना दुपारी व्यवसाय करणं अशक्य झालं आहे. "ग्राहक येत नाहीत, आम्ही बसून काय करायचं?" असं म्हणत फलविक्रेता किशोरभाऊ टोपे छायेत थांबतोय.

वर्गात फॅन चालू, पण श्वास गरम 

शाळांमधूनही त्रासदायक चित्रं समोर येत आहेत. "फॅन चालू आहे, पण उकाडा कमी होत नाही. मुलं एका तासात दमतात," असं सांगत एका शाळेच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली. काही जिल्ह्यांत दुपारचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज, पण त्रस्त 

लोणावळा, अमरावती, अकोला, ब्रम्हपुरी अशा शहरांमध्येही तापमान ४४ ते ४५ अंशांच्या घरात असून, हिट-स्ट्रोकची भीती वाढली आहे. रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन आणि चक्कर येण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य खात्याने ‘ओआरएस’ व पाण्याचा साठा राखण्याचे आदेश दिले आहेत.

कामगारांची कोंडी – उन्हामुळे मजूर घरी बसले 

साइटवर काम करणारे, बांधकाम मजूर, कचरा वेचक महिलांना हे ऊन म्हणजे रोजचं संकट. "उन्हात काम केलं तर त्रास होतो, पण काम नसलं तर खायचं काय?" हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.