महाराष्ट्र सरकारने आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या काही मानाच्या पालख्या, वारकऱ्यांसह भाविकांना टोलमाफी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
Ashadhi Wari Toll Waiver : राज्य सरकारने आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. १८ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत ही सवलत लागू असणार आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर ही सवलत लागू केली जाणार आहे.
टोलमाफीचा शासन निर्णय
२८ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी तयारीसंबंधी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांसाठी सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच वाहनांना टोलमाफी देण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृत आदेश काढून टोल सवलतीचा निर्णय जाहीर केला.
कोणत्या वाहनांना मिळणार टोलमाफी?
- आषाढी वारीच्या मार्गावरून जाणाऱ्या १० मानाच्या पालख्या
- वारकरी आणि भाविकांची हलकी व जड वाहने
- ही सवलत फक्त प्रवासाच्या (पंढरपूरकडे) आणि परतीच्या (पंढरपूरहून) दोन्ही दिशांना लागू असेल
टोलपास आणि स्टिकर्स कुठे मिळतील?
सवलतीसाठी भाविकांना आणि वारकऱ्यांना वाहनावर पुढीलप्रमाणे माहिती असलेले स्टीकर्स लावणे आवश्यक आहे:
“आषाढी एकादशी २०२५, गाडी क्रमांक, चालकाचे नाव”
हे स्टीकर्स पुढील ठिकाणी समन्वय साधून उपलब्ध होतील:
- परिवहन विभाग
- वाहतूक पोलीस / पोलीस चौक्या
- स्थानिक RTO कार्यालये
यामध्ये आवश्यक संख्येनुसार पास देण्यात येतील आणि परतीच्या प्रवासातही हे पास वैध असतील. त्यामुळे एकाच स्टीकरचा वापर दोन्ही मार्गासाठी करता येईल.
सुरळीत वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था
- Highway Security Patrolling (HSP) यंत्रणा पथकर नाक्यांवर सक्रिय ठेवण्याचे निर्देश
- परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस आणि गाड्यांची सोडण्याची तयारी
- MSRDC व MSSC (Maharashtra State Security Council) फोर्सची जास्त संख्येने तैनाती
- गृह विभागामार्फत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
या निर्णयामुळे आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविक व वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, टोल माफ केल्यामुळे त्यांच्या प्रवासात आर्थिक आणि व्यवस्थात्मक सुलभता निर्माण होईल.


