Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पाहा मुंबईसह राज्यात कुठे-कुठे पावसाच्या सरी बसणार आहे याबद्दल सविस्तर..

Maharashtra Rain Update : नागरिकांना अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाचे अखेर आगमन झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे. याशिवाय मुंबईसह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

विदर्भात मान्सूनचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय मुसळधार पावसाच्या सरी बसरणार असल्याचेही IMD ने म्हटले आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसाठी पुढील काही तास महत्वाचे आहेत. यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावे.

वादळी पावसाची शक्यता

राज्यातील उर्वरित भागांमध्येही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींसह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदलामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला आहे.

पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.