पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘गंधर्व’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका महिला प्रेक्षकाच्या साडीखाली उंदीर घुसल्याने गोंधळ उडाला. या घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली असून नाट्यगृहाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे | प्रतिनिधी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी संध्याकाळी रंगलेल्या नाटकाच्या प्रयोगात एक विचित्र आणि चिंताजनक प्रकार घडला. ‘गंधर्व’ या नाटकाचा प्रयोग सुरु असताना एक उंदीर थेट एका महिला प्रेक्षकाच्या साडीखाली घुसल्याने क्षणभरासाठी प्रेक्षागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हा प्रकार घडला त्यावेळी प्रयोग सुरु होता आणि सभागृहात सुमारे ८०० पेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. अचानक एका महिलेच्या किंचाळण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळं काही क्षणांसाठी प्रयोग थांबवावा लागला. त्या महिलेला मदतीने बाहेर नेण्यात आलं. उंदीर तिच्या साडीमध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक प्रेक्षक चकित झाले, तर काहीजण नाराजीने सभागृहाबाहेर गेले.

संपर्क साधला असता नाट्यगृह व्यवस्थापनाने प्राथमिक उत्तर देताना सांगितलं की, “आम्ही नियमित स्वच्छता करतो, मात्र अशा घटना दुर्दैवी आहेत. आम्ही सखोल चौकशी करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल.”

पुण्याचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे अनेक मोठ्या नाट्यप्रयोगांचं व्यासपीठ आहे. अशा ठिकाणी उंदीरप्रमाणे प्रसंग घडणं केवळ गैरसोयीचं नाही, तर प्रेक्षकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न निर्माण करतं आहे.

कलाविश्व हे फक्त कलाकारांनी नाही, तर व्यवस्थापनानेही सांभाळायचं असतं. रोजचे प्रयोग, येणारे प्रेक्षक, आणि त्यांच्या अपेक्षा – या सगळ्यांची जबाबदारी घेताना फक्त रंगमंचाची प्रकाशयोजना आणि ध्वनीव्यवस्था पुरेशी नाही, तर मूलभूत गोष्टींना प्राथमिकता दिली पाहिजे. त्यामध्ये जसं की स्वच्छता, कीटकमुक्तता, आपत्कालीन यंत्रणा यांचा समावेश होतो.

जर नाट्यगृहात प्रेक्षक सुरक्षित नसतील, तर हे सांस्कृतिक मंदिरही रिकामं होण्यास वेळ लागणार नाही. वेळेवर जागं व्हा, व्यवस्थापनात ‘दृश्य’ बदलण्याची आता खरी वेळ आहे!