आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकच्या बाटल्या टाळून स्टील किंवा मातीच्या बाटल्या वापरणं सर्वात उत्तम आहे, असं तज्ज्ञ सांगतात. तांब्याच्या बाटलीमुळे प्रतिकारशक्ती वाढते, पण तिचा अतिवापर आणि त्यात आंबट पदार्थ ठेवणं धोकादायक ठरू शकतं.

मुंबई : दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याची बाटली गरजेची असते. पण आपण कोणत्या बाटलीतून पाणी पितो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे का की, पाण्याच्या बाटल्यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो? बाजारात प्लास्टिक, काच, तांबे, स्टील आणि मातीच्या बाटल्या मिळतात. पण यातली आपल्यासाठी सर्वोत्तम कोणती?

काचेच्या बाटल्या (Glass Bottles)

काच कोणत्याही केमिकलसोबत रिएक्ट करत नाही (Non-toxic). यात गरम पाणी ठेवलं तरी कोणतेही विषारी घटक पाण्यात मिसळत नाहीत. ही बाटली 100% रिसायकल करता येते आणि त्यामुळे पाण्याची चवही बदलत नाही. पण या बाटल्या वजनाने जड असतात आणि खाली पडल्यास फुटण्याचा धोका असतो. ऑफिस किंवा घरासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

तांब्याच्या बाटल्या (Copper Bottles)

आयुर्वेदात तांब्याच्या भांड्याला विशेष महत्त्व आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाण्याचा pH स्तर वाढतो आणि ते अल्कलाईन (alkaline) होतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण तांब्याच्या बाटलीचा अतिवापर करू नये. यात दूध किंवा लिंबाचा रस यांसारखे आंबट पदार्थ ठेवू नका. बाटली नीट स्वच्छ न केल्यास उलट्या किंवा लिव्हरच्या समस्या उद्भवू शकतात.

प्लास्टिकच्या बाटल्या (Plastic Bottles)

या हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे बहुतेक लोक याच बाटल्या वापरतात. पण आरोग्यासाठी या सर्वात धोकादायक आहेत. प्लास्टिकमध्ये असलेले BPA आणि थॅलेट्स (Phthalates) सारखे केमिकल्स उन्हाच्या संपर्कात आल्यावर पाण्यात मिसळतात. यामुळे कॅन्सर आणि मेंदूच्या विकासात अडथळा येण्यासारखे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्या टाळा. अगदीच गरज असेल तर 'BPA-Free' बाटल्याच वापरा.

स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या (Stainless Steel Bottles)

रोजच्या वापरासाठी स्टीलच्या बाटल्या सर्वोत्तम पर्याय आहेत, असं तज्ज्ञ सांगतात. या बाटल्या टिकाऊ, वजनाला हलक्या असतात आणि त्यातून कोणतेही केमिकल रिलीज होत नाहीत. गरम किंवा थंड पाणी ठेवण्यासाठी त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. या बाटल्या दीर्घकाळ टिकतात आणि पर्यावरणालाही कोणतंही नुकसान पोहोचवत नाहीत.

मातीच्या बाटल्या (Clay/Earthen Bottles)

मातीच्या भांड्यातून पाणी पिणं ही आपली जुनी परंपरा आहे. मातीमध्ये नैसर्गिक अल्कलाईन गुणधर्म असतात, ज्यामुळे पाण्याचा pH स्तर संतुलित राहतो. यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि ॲसिडिटी कमी होते. काचेच्या बाटल्यांप्रमाणेच या बाटल्याही लवकर फुटण्याची शक्यता असते आणि त्यांची नियमित स्वच्छता करणं गरजेचं असतं.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

  1. स्टेनलेस स्टीलची बाटली वापरा.
  2. मातीचा माठ किंवा काचेची बाटली वापरा.
  3. दिवसातून थोडा वेळच तांब्याच्या बाटलीतील पाणी प्या.
  4. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद करा किंवा खूप कमी करा.