देशात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदा फ्रेंडशिप डे येत्या 3 ऑगस्टला साजरी केला जाणार आहे. या
Friendship Day 2025 : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचा उत्सव. या दिवशी मित्र-मैत्रिणींमध्ये प्रेम, स्नेह, विश्वास आणि एकमेकांवरील निष्ठा साजरी केली जाते. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारतात हा दिवस विशेषतः तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मैत्रीच्या या सुंदर नात्याला एक दिवस देण्यामागे एक भावनिक आणि सामाजिक विचार आहे.यंदा फ्रेंडशिप डे येत्या 3 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.
फ्रेंडशिप डे साजरण्याची सुरुवात कशी झाली?
फ्रेंडशिप डेची संकल्पना प्रथम अमेरिकेमध्ये 1930च्या दशकात आणली गेली. अमेरिकन ग्रीटिंग कार्ड कंपनीच्या संस्थापकांनी या दिवसाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर 1958 साली World Friendship Crusade या परिषदेने ही कल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली आणि ३० जुलै हा 'इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे' म्हणून मान्यता मिळाली. मात्र, भारतासह अनेक देशांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
भारतामध्ये या दिवशीचा उत्साह
भारतात फ्रेंडशिप डे एक सामाजिक उत्सव बनला आहे. यामध्ये फ्रेंडशिप बँड बांधणे, गिफ्ट्स देणे, एकत्र फिरायला जाणे, पार्ट्या करणे, आठवणी शेअर करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.अनेक महाविद्यालये, शाळा आणि तरुणांच्या ग्रुपमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. सोशल मीडियावर स्टेटस, फोटो आणि मैत्रीवरील पोस्टचा पाऊस पडतो.
फ्रेंडशिप डे मागील भावना
या दिवसामागे असलेला मुख्य उद्देश म्हणजे माणसामाणसातील मैत्रीचे नाते अधिक दृढ करणे. सध्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात नातेसंबंध टिकवणे कठीण झाले आहे. अशा वेळी फ्रेंडशिप डेचा एक खास दिवस आपल्याला आपल्या मित्रांच्या आठवणींमध्ये रमवतो आणि त्या नात्याला नव्याने उजाळा देतो. तो फक्त गिफ्ट्स किंवा बँड पुरता मर्यादित नसतो, तर आभार मानण्याचा आणि नातं टिकवण्याचा दिवस असतो.
फ्रेंडशिप डे म्हणजे फक्त एक दिवस नव्हे, तर माणुसकी, स्नेह, विश्वास आणि आधार यांचे प्रतीक आहे. मित्र हे जीवनातील आधारस्तंभ असतात. यामुळेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी असा एक खास दिवस महत्त्वाचा ठरतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा खास दिवशी आपण आपल्या मित्रांना वेळ देतो, त्यांच्या आठवणींना उजाळा देतो आणि मैत्रीच्या नात्याला अजून घट्ट करतो.
