Twisha Sharma Case : भोपाळमधील ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलंय. मॉडेलिंग, तेलुगू चित्रपट आणि कॉर्पोरेट करिअर... पण तिचा शेवट आत्महत्या की कटकारस्थान? कुटुंबाचे आरोप, CCTV फुटेज वाद, हुंड्यासाठी छळ आणि फरार आरोपी पतीमुळे हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनलं आहे.

Twisha Sharma Death Case : भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाने सगळ्या देशाला हादरवून सोडलं आहे. आतापर्यंत लोक ट्विशाला फक्त एका निवृत्त न्यायाधीशांची सून आणि हाय-प्रोफाइल वकिलाची पत्नी म्हणून ओळखत होते. पण आता तिच्या आयुष्याचा एक ग्लॅमरस आणि कधीही न ऐकलेला पैलू समोर आला आहे. मॉडेलिंग आणि कॉर्पोरेट जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या २५ वर्षीय ट्विशाच्या रहस्यमय मृत्यूने एक नवीन वळण घेतलं आहे. या वेदनादायी अंतामागे दडलेलं कटू सत्य आणि कौटुंबिक वादाचे थर आता एक-एक करून उलगडत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Scroll to load tweet…

'मिस पुणे' ते कॉर्पोरेट मॅनेजर: एक चमकणारा चेहरा

ट्विशा शर्माचा आयुष्यभराचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. २०१२ मध्ये 'मिस पुणे'चा किताब जिंकल्यानंतर तिच्यासाठी ग्लॅमरच्या दुनियेचे दरवाजे उघडले होते. तिने 'Dove' आणि 'L'Oréal' सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या. इतकंच नाही, तर २०१८ मध्ये 'जरा संभल के' या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये आणि २०२१ मध्ये आलेल्या 'मुग्गुरू मोनागल्लू' या तेलुगू कॉमेडी-थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने अभिनय क्षेत्रातही आपलं स्थान निर्माण केलं. पण चित्रपटांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ती खचली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून BBA केल्यानंतर तिने डिस्टन्स लर्निंगमधून MBA केलं आणि 'जर्मन अकादमी डिजिटल एज्युकेशन'मध्ये कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात नवी ओळख बनवली.

Scroll to load tweet…

मॅट्रिमोनियल साइटवर भेट आणि 'हनिमून'पासूनच सुरू झाला छळ

कॉर्पोरेट जगात काम करत असतानाच एका मॅट्रिमोनियल साइटवरून तिची ओळख भोपाळच्या बागमुगलिया एक्सटेंशनमध्ये राहणाऱ्या समर्थ सिंहसोबत झाली. ओळख वाढली आणि डिसेंबर २०२५ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण या लग्नाच्या मांडवातूनच तिच्या आयुष्यात कडवटपणा सुरू झाला, ज्यामुळे तिला घुसमटून जगावं लागलं. ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या मते, समर्थ सुरुवातीपासूनच गुन्हेगारी मानसिकतेचा होता. लग्नानंतर हनिमूनला जाताना भोपाळ विमानतळावरच त्याने ट्विशाला निर्दयीपणे ढकलून दिलं होतं. समाजात काय म्हणतील या भीतीने कुटुंबाने तेव्हा गप्प राहणं पसंत केलं, जी आता ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानत आहेत.

Scroll to load tweet…

CCTV फुटेजचं 'रहस्य': आत्महत्या की पूर्वनियोजित कट?

ट्विशाच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह यांच्या घराच्या CCTV फुटेजवर मृत ट्विशाची बहीण नैनाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नैनाचा आरोप आहे की, फुटेजमध्ये ट्विशा जेव्हा गच्चीकडे जात आहे, तेव्हा ती खूप शांत दिसत आहे आणि तिच्या हातात हेडफोन आहेत. गच्चीवर एक जिमसुद्धा आहे, जिथे ती कदाचित व्यायामासाठी गेली होती. फुटेजमध्ये फक्त तिचं वर जाणं दिसतंय, पण मधल्या वेळेत काय झालं, तो भाग गायब आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये पती समर्थ तिला पायऱ्यांवर झोपवून CPR देताना दिसतोय, ज्याला कुटुंब फक्त एक नाटक म्हणत आहे. कुटुंबीयांचा सवाल आहे की, जर इतकीच काळजी होती, तर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही?

Scroll to load tweet…

चारित्र्यहनन आणि धमक्या: न्यायाच्या प्रतीक्षेत मृतदेह

ट्विशाच्या रहस्यमय मृत्यूला आठ दिवस उलटून गेले आहेत, पण न्यायाच्या मागणीवर ठाम असलेल्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, सासरची मंडळी प्रतिष्ठित असल्यामुळे दुसऱ्या पोस्टमॉर्टमच्या प्रक्रियेत मुद्दाम उशीर करत आहेत, जेणेकरून पुराव्यांशी छेडछाड करता येईल. दुसरीकडे, माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी ट्विशाला 'ड्रग ॲडिक्ट' म्हटल्याने तिचा भाऊ हर्षित संतापला आहे. हे आपल्या बहिणीचं चारित्र्यहनन असल्याचं सांगत तो म्हणाला की, अटकपूर्व जामिनावर बाहेर फिरणारी एक महिला आमच्या कुटुंबाला गुंडांकडून मारहाण करण्याची धमकी देत आहे.

Scroll to load tweet…

मुख्य आरोपी फरार, पोलिसांनी आवळला फास

या हाय-प्रोफाइल प्रकरणात पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह यांना २४ तासांच्या आत कोर्टातून जामीन मिळाला, तर दुसरीकडे मुख्य आरोपी आणि ट्विशाचा पती समर्थ सिंह अजूनही पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आहे. पोलिसांनी आरोपी समर्थच्या अटकेवर १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे आणि त्याला पाताळातूनही शोधून काढण्यासाठी ६ विशेष पथकं सतत छापेमारी करत आहेत. आता कायद्याच्या रक्षकांच्या या प्रतिष्ठित कुटुंबाविरोधात ट्विशाच्या असहाय्य आई-वडिलांना कधी आणि कसा न्याय मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.