दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात काही तरुणांनी आपल्याला आणि आपल्या दिवंगत आईला शिवीगाळ केली होती. पण मी त्या मुलांना माफ केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे सांगितलं आहे. समाजानेही त्यांना माफ करून योग्य मार्ग दाखवावा, असं आवाहन त्यांनी केलं.
नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर 'करप्पन पूची जनता' पक्ष, विद्यार्थी संघटना आणि तरुणांनी मोठं आंदोलन केलं होतं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला
दिल्लीच्या जंतरमंतरवर घडलेल्या एका घटनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आंदोलनादरम्यान काही मुलांनी माझ्याबद्दल आणि माझ्या दिवंगत आईबद्दल अत्यंत वाईट शब्द वापरले. हे संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिलं. अशा गोष्टींमुळे समाजात राग निर्माण होणं स्वाभाविक आहे, हे मला समजतं. पण तरुण वयात चुका होतात आणि त्या सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.
तरुणांना माफ करतो
चूक केलेल्या त्या मुलांना शिक्षा देण्याऐवजी, कोर्टात खेचण्याऐवजी किंवा सामाजिकरित्या त्रास देण्याऐवजी, समाजाने त्यांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. "मला त्यांना माफ करायचं आहे आणि समाजानेही हीच भावना स्वीकारावी," असं ते म्हणाले.
तरुणांनी देशासाठी एकत्र येऊन पुढे जायला हवं. झालेल्या चुकांमधून शिकून आपल्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करायला हवा. देश वेगाने पुढे जात आहे आणि प्रत्येक तरुणाने आयुष्यात प्रगती करावी, हीच माझी इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्या आईला शिवीगाळ केली
"आपण सर्वांनी भारतासाठी एकत्र येऊन काम करूया," असं आवाहन मोदींनी केलं. तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "शिवीगाळ करून काहीही साध्य होणार नाही. जे भरकटले आहेत, त्यांना मार्ग दाखवूया. एकत्र काम करूया. भारतासाठी काम करूया."
जंतरमंतरवरील आंदोलनात काही मुलांनी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली, असं सांगत पंतप्रधान म्हणाले, “आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं. जंतरमंतरवर काय झालं, हे देशाने आणि जगाने पाहिलं. काही खोडकर मुलांनी अत्यंत गलिच्छ आणि सुसंस्कृत समाजाला न शोभणारे शब्द वापरले. वैयक्तिकरित्या मला आणि माझ्या दिवंगत आईलाही शिवीगाळ केली. ते खूपच वाईट दृश्य होतं.”
या घटनेमुळे अनेकजण संतापले
या घटनेमुळे अनेकांना राग आल्याचं मान्य करत, मुलांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. "मला समाजात निर्माण झालेला राग समजू शकतो. आपल्या मुली अशी भाषा वापरताना पाहणं हा एक सांस्कृतिक धक्का आहे. पण आता या मुलांना जवळ घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची वेळ आली आहे. ते भरकटले आहेत आणि त्यांना मार्ग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे," असं पंतप्रधान म्हणाले.
मुलांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य
कायदेशीर कारवाई आणि सामाजिक त्रासाने हा प्रश्न सुटणार नाही, असंही पंतप्रधान म्हणाले. "त्यांना शिक्षा देणे, कोर्टात खेचणे, समाजात त्यांना त्रास देणे, याने परिस्थिती बदलणार नाही. मला त्यांना माफ करायचं आहे. समाजानेही हे स्वीकारलं पाहिजे," असं मोदी म्हणाले.
"माझ्या मनात एकच भावना आहे. कधीकधी आपली जीभ दाताखाली येते आणि रक्त येतं, पण म्हणून आपण दात तोडून टाकत नाही; कारण दातही आपले आहेत आणि जीभही आपलीच आहे. ही मुलंही आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. भरकटलेल्यांना मार्ग दाखवणं कठीण आहे, पण ते काम आपल्याला करावंच लागेल," असं ते पुढे म्हणाले.
चुकांमधून शिकून पुढे जा
"चला, मी त्या मुलांना बोलावतो, देशासाठी आपण एकत्र पुढे जाऊया. काहीतरी नवीन शिकूया, आपल्या चुकांमधूनही शिकूया. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी निघूया. देश पुढे जात आहे आणि आणखी पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. तुम्हीही पुढे जावं हे माझं स्वप्न आहे. मी तुमच्यासाठी जगतो; तुमच्या भविष्यासाठी स्वतःला समर्पित करतो. चला, देशाला एकत्र पुढे घेऊन जाऊया. चुकांमधून शिका आणि पुढे जा," असं ते म्हणाले.
हा व्हिडिओ पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, NEET परीक्षेतील गोंधळावरून CJP संघटनेने केलेल्या आंदोलनात पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नोएडा पोलिसांनी एका महिलेवर एफआयआर दाखल केला होता.


