राष्ट्रीय महामार्गांवर (NHAI) अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांची समस्या सोडवण्यासाठी 'क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज'ला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांना आता 'राजमार्गयात्रा' ॲपवर अस्वच्छ टॉयलेटचा जिओटॅग केलेला फोटो अपलोड करून तक्रार करता येईल. यशस्वी तक्रारीनंतर त्यांना १००० रुपयांचे फास्टॅग रिचार्ज बक्षीस म्हणून मिळेल.
आपण जेव्हा हायवेवरून लांबच्या प्रवासाला जातो, तेव्हा एक मोठी अडचण असते ती म्हणजे स्वच्छ टॉयलेटची. ज्यांनी कोणी आपल्याकडच्या रस्त्यांवरून लांबचा प्रवास केला आहे, ते नक्कीच सहमत होतील. सरकारने रस्त्यांच्या आणि महामार्गांच्या कडेला अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत, पण त्यापैकी बहुतांश शौचालयांची अवस्था खूपच खराब असते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. आता याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक अशी योजना आणली आहे, ज्यात तुम्हाला अस्वच्छ शौचालयाची तक्रार केल्याबद्दल बक्षीस मिळू शकतं.
खरंतर, ही योजना 'क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज'चाच एक भाग आहे, जी सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झाली होती. आता NHAI ने या योजनेला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कल्पनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत ४२९ प्रवाशांनी अस्वच्छ शौचालयांची तक्रार केली आणि प्रत्येकी १००० रुपयांचे फास्टॅग रिचार्ज मिळवले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे सर्व प्रवासी या योजनेत सहभागी होऊ शकतात. यासाठी त्यांना 'राजमार्गयात्रा' मोबाईल ॲपची लेटेस्ट आवृत्ती वापरावी लागेल. या ॲपद्वारे त्यांना अस्वच्छ शौचालयाचे स्पष्ट, टाइम-स्टॅम्प आणि जिओटॅग असलेले फोटो शेअर करावे लागतील. फोटो सबमिट करताना, वापरकर्त्यांना त्यांचं नाव, ठिकाण, मोबाईल नंबर आणि गाडीचा नोंदणी क्रमांक (VRN) यांसारखी माहिती द्यावी लागेल.
फोटो आणि माहितीची तपासणी केल्यानंतर, प्रत्येक पात्र वाहन नोंदणी क्रमांकाला (VRN) १००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. ही रक्कम थेट त्या गाडीच्या फास्टॅग खात्यात जमा होईल. या योजनेच्या कालावधीत प्रत्येक गाडीच्या नंबरवर फक्त एकदाच बक्षीस मिळेल. हे बक्षीस दुसऱ्याला देता येणार नाही किंवा याच्या बदल्यात रोख रक्कम मिळणार नाही. एकाच दिवशी एकाच शौचालयाबद्दल अनेक तक्रारी आल्यास, 'राजमार्गयात्रा' ॲपवर आलेली पहिली तक्रारच विचारात घेतली जाईल.
ही योजना फक्त NHAI ने बांधलेल्या, चालवलेल्या किंवा देखरेख केलेल्या शौचालयांनाच लागू आहे. पेट्रोल पंप, धाबे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालये NHAI च्या अखत्यारीत येत नसल्यामुळे त्यांचा या योजनेत समावेश नाही. आलेल्या सर्व तक्रारींची AI-आधारित प्रणाली आणि नंतर प्रत्यक्ष माणसांकडून तपासणी केली जाते.
भारतात लांबच्या प्रवासात स्वच्छ शौचालय शोधणं हे एक मोठं आव्हान असतं, त्यामुळे NHAI चा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. अनेक शौचालये अस्वच्छ असतात, तर काही सरकारी शौचालये बंदच असतात. या योजनेमुळे आपल्या महामार्गांवरील शौचालयांची स्थिती सुधारेल अशी NHAI ला आशा आहे. सोशल मीडियावरही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

