नोएडातील एका सीईओने आपला अनुभव शेअर केला आहे, जिथे एका Gen Z उमेदवाराने मुलाखतीदरम्यान कामाच्या वेळी रोज ३० मिनिटांच्या झोपेची मागणी केली. या विचित्र मागणीमुळे सुरुवातीला धक्का बसला, पण नंतर कामाचे तास आणि कामाचा दर्जा यावर एक नवीन चर्चा सुरू झाली. ही लिंक्डइन पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

नोएडातील एका स्टार्टअपसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे - कर्मचाऱ्यांची गुणवत्ता त्यांनी किती तास काम केलं यावरून मोजायची की त्यांनी काय काम केलं यावरून? हा प्रश्न तेव्हा निर्माण झाला, जेव्हा नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेल्या एका Gen Z उमेदवाराने दिवसा कामाच्या वेळेत ३० मिनिटांच्या झोपेची (नॅप) मागणी केली. 'इन्स्टा ॲस्ट्रो'चे संस्थापक आणि सीईओ नितीन वर्मा यांनी हा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला. मुलाखतीत तो उमेदवार म्हणाला, "सर, मला रोज दुपारी अर्धा तास झोपायला लागेल. यामुळे माझं काम अधिक चांगलं होतं." सुरुवातीला वर्मा यांना ही मागणी विचित्र वाटली, पण यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल पुन्हा विचार करायला भाग पाडलं.

वर्मा यांनी सांगितलं की, तो उमेदवार ही मागणी करताना अजिबात घाबरलेला किंवा मस्करीत बोलत नव्हता. उलट, जसं कुणी पगाराबद्दल किंवा इतर सोयीसुविधांबद्दल बोलतं, त्याच आत्मविश्वासाने तो बोलत होता. वर्मा म्हणाले की, त्यांच्या पिढीतल्या कुणी मुलाखतीत असं झोपेबद्दल विचारलं असतं, तर तिथेच ती मुलाखत संपली असती.

पण त्या उमेदवाराला थेट नकार देण्याऐवजी, वर्मा यांनी त्याला सांगितलं की, जोपर्यंत तो दिलेलं काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण करतोय, तोपर्यंत तो झोप घेतो की नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. जर काम चांगलं असेल, तर ते त्याचे कामाचे तास मोजत बसणार नाहीत. पण जर कामच नीट होत नसेल, तर झोप घेतल्याने काही फायदा होणार नाही.

या भूमिकेमुळे वर्मा यांचा या मागणीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यांना जाणवलं की, तो उमेदवार हक्क गाजवत नव्हता, तर तो कशाप्रकारे उत्तम काम करू शकतो हे आत्मविश्वासाने सांगत होता.

संस्थापकाने पुढे सांगितलं की, त्यांना त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणा आवडला. कारण बहुतेक उमेदवार मुलाखतीत कंपनीला काय ऐकायला आवडेल, तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. पण याउलट, या उमेदवाराने आपलं काम चांगलं होण्यासाठी काय गरजेचं आहे, हे स्पष्टपणे सांगितलं होतं. या घटनेमुळे वर्मा यांना नव्या पिढीच्या कामाच्या पद्धती आणि त्यांच्या अपेक्षांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केलं.

ते म्हणाले की, पारंपरिक कंपन्यांमध्ये कर्मचारी किती तास खुर्चीवर बसून आहे, यावरून त्याचं काम मोजलं जातं. पण असं दिसतंय की, आजची तरुण पिढी कामाच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा, लवचिकता आणि आपल्या सोयीनुसार काम करण्याला जास्त महत्त्व देत आहे.

व्हायरल लिंक्डइन पोस्ट

वर्मा यांनी हेही स्पष्ट केलं की, Gen Z कर्मचाऱ्यांच्या सगळ्याच मागण्या योग्य असतील असं नाही. पण या प्रकरणात, त्या उमेदवाराने अशी मागणी केली होती, ज्यावर थेट नकार देण्याऐवजी विचार करायला हवा, असं त्यांना वाटलं.

इंटरनेटवर लोकांच्या प्रतिक्रिया

ही पोस्ट वाचल्यानंतर लिंक्डइनवर अनेक युजर्सनी या मताला सहमती दर्शवली की, कामाचं मूल्यमापन हे कामाच्या निकालावरून व्हायला हवं, केवळ कामाच्या तासांवरून नाही. एका युजरने लिहिलं की, हल्ली कामाच्या दर्जाऐवजी कामाचे तास मोजण्यावर भर दिला जातो, पण खरं तर कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम आणि KPIs पूर्ण केले की नाही हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, Gen Z पिढीला पारदर्शकता खूप आवडते आणि जर उमेदवारांना त्यांच्या कामाच्या पद्धतींबद्दल मोकळेपणाने बोलता आलं, तर कंपन्यांना योग्य माणसं निवडणं सोपं जाईल.