Farmer Protest : 29 फेब्रुवारीपर्यंत 'दिल्ली चलो' आंदोलन स्थगित, आंदोलक तरुणाच्या मृत्यूवर कार्यवाही करण्याची मागणी

| Published : Feb 24 2024, 10:30 AM IST / Updated: Feb 24 2024, 10:33 AM IST

Farmers Protest

सार

शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनात नुकताच एका तरुणाचा मृत्यू झाला. यावरुन आता शेतकऱ्यांनी हरियाणा पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा तरुणाचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करणार नाहीत असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Farmers Protest : सध्या पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पिकांच्या किंमात आधारभूत किंमतीसंदर्भात (MSP) केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलन करत आहेत. गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करतायत. याच आंदोलनादरम्यान दोन दिवसांपूर्वी एका 21 वर्षीय तरुणाला गोळी लागून मृत्यू झाला. यानंतर शेतकरी संघटनांनी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब पोलिसांनी हरियाणातील पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तरुणाचे शवविच्छेदनासह त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाहीत असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय शुभ करण सिंह या तरुणाच्या परिवाराने एफआयआर (FIR) दाखल होण्यासह पंजाब सरकारकडून देण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील नाकारली. जो पर्यंत पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोवर आंदोलनासंदर्भात सरकारसोबत बातचीत केली जाणार नसल्याचे देखील शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

सरवन सिंह पंढेर यांनी दिली अशी प्रतिक्रिया
किसान मजदूर संघ कमेटीचे नेते सरवन सिंह पंढेर यांनी हिंदूस्थान टाइम्सशी फोनवरुन संवाद साधताना म्हटले की, मृत्यू झालेल्या शुभ करण सिंह याला शहीदचा दर्जा द्यावा अशी मागणी करणार आहोत. यानंतरच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी परवानगी देऊ. याशिवाय हरियाणा पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा दिल्लीच्या दिशेने पुन्हा कूच करण्यास सुरुवात करू.

दुसऱ्या बाजूला नेते जगजीत सिंह दल्लेवाल यांनी म्हटले की, सध्या आम्ही शुभ करण सिंह याला न्याय मिळावा याकडे लक्ष देत आहोत. यामुळेच आम्ही येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत आमचे आंदोलन स्थगित करत आहोत. यानंतर नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाहीची घोषणा केली जाईल.

आणखी वाचा : 

PM Modi Visit UP : '10 वर्षांत बनारसने मला बनारसी बनवले', अमूल बनास डेअरी प्लांटच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केल्या अशा भावना

Explainer : बायजूसचे संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

Sandeshkhali Case : ममता बॅनर्जी संदेशखळीतील कोणते सत्य लपवण्याचा करताहेत प्रयत्न? BJPने जारी केली डॉक्युमेंट्री