Bihar Politics : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून नवीन नेतृत्वाची निवड प्रक्रिया सुरू असून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठा उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. जवळपास दोन दशकांच्या कारकीर्दीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात सत्तांतराची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या असून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे.

राजीनाम्याच्या हालचालींना वेग

मंगळवारी नितीश कुमार यांनी शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतल्यानंतर आपल्या मंत्र्यांना राजीनाम्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. दुपारी राज्यपालांकडे अधिकृत राजीनामा सादर केला जाऊ शकतो.

राजभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त

नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेमुळे पाटण्यातील राजभवन परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. राजभवनाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून दुपारी ३ वाजेपर्यंत राजीनामा सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून नेतृत्व निवडीची प्रक्रिया सुरू

भाजप हायकमांडने नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने सर्व आमदारांना पाटणा येथे बोलावले असून लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

सम्राट चौधरी आघाडीवर

उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाभोवती वाढवलेली सुरक्षा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी यामुळे त्यांच्या नावाला अधिक बळ मिळत आहे.

नवीन सरकार स्थापनेची तयारी

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन नेत्याच्या नावाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. शपथविधी बुधवारी होण्याची शक्यता आहे.

राजकीय बदलाचे संकेत

गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता बिहारमध्ये मोठा राजकीय बदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.