तामिळनाडूचे अब्दुल आलिम, जे एकेकाळी झोहो कंपनीत सुरक्षा रक्षक होते, आज त्याच कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कठोर परिश्रम, शिकण्याची जिद्द आणि एका वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी पदवी नसतानाही केवळ कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले. 

तामिळनाडूचा अब्दुल आलिम हे नाव सध्या सोशल मिडीयावर चर्चेचं कारण ठरलं आहे. सुरुवातीला ते झोहो ऑफिसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते, पण आज ते झोहोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत आणि त्यांच्या संघर्षाची ही कथा अनेकांना प्रेरणा देते.

दोन महिने रस्त्यावर काढले दिवस 

२०१३ मध्ये आलिम आपल्या घरातून फक्त 1,000 रुपये घेऊन बाहेर पडले. त्यापैकी 800 रुपये त्यांनी रेल्वे तिकीटावर खर्च केले. काही काळ त्यांच्याकडे घर नव्हतं, त्यांनी सुमारे दोन महिने रस्त्यावरच दिवस काढावे लागले. नोकरी न मिळाल्याने ते झोहो कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागले. एका १२-तासांच्या शिफ्ट दरम्यान, झोहोतील एक वरिष्ठ कर्मचारी शिबू अ‍ॅलेक्सिस यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी आलिम यांच्याकडे फक्त दहावी शिक्षण आणि काही HTML ज्ञान होतं, पण शिकण्याची तीव्र इच्छा होती.

तुमच्याकडे डिग्री नसली तरी कौशल्य महत्वाचं

अ‍ॅलेक्सिस यांनी आलिमला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. दिवसा काम करून संध्याकाळी प्रोग्रामिंग शिकणं असा त्यांचा दिनक्रम होता. आठ महिन्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नात, आलिमने एक साधं अ‍ॅप तयार केलं असून त्याने यूजर इनपुट व्हिज्युअलाइज केलं. त्या अ‍ॅपला झोहोतील एक व्यवस्थापकाने पाहिलं आणि आलिमला मुलाखतीची संधी दिली. त्यांनी विचारलं की “तुमच्याकडे कॉलेज पदवी आहे का?” पण झोहोमधील उत्तर होतं: “येथे कॉलेज डिग्री नाही, तर तुमची क्षमता आणि कौशल्य महत्वाची आहे.”

आलिम हे कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतायेत 

आता, झोहोमध्ये आठ वर्षांनंतर, आलिम Software Development Engineer म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आभार व्यक्त केले: शिबू अ‍ॅलेक्सिसला, झोहो कंपनीला आणि स्वतःलाच — “शिकायला कधीच उशीर होत नाही" असं त्यांनी म्हटलं आहे. सोशल मिडियावर अनेक लोकांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं असून झोहोच्या कौशल्यावर लक्ष देण्याच्या संस्कृतीचे कौतुक केले.