पुण्यातील खेड तालुक्यात आंतररजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या घरच्या मंडळींनी जावयावर हल्ला करण्यासह लेकीचे अपहरण केले. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून वेगाने सध्या तपास सुरू आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील घटना घडली आहे. 'सैराट' चित्रपटातील घटनांची आठवण करून देणारा हा प्रकार खरपुडी गावात घडला असून, आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे आणि त्याच्या पत्नीचं तिच्या नातेवाईकांकडून अपहरण करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण पसरलं असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण १५ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय आहे प्रकरण?

खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी (वय २८) यांनी काही महिन्यांपूर्वी समाजाच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही गावात शांतपणे राहत होते. मात्र प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी या नात्याला सुरुवातीपासून तीव्र विरोध केला होता.

रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास, प्राजक्ताचे नातेवाईक गावात आले. त्यांनी आधी विश्वनाथ गोसावी याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर प्राजक्ताचं जबरदस्तीने अपहरण करत तिला वाहनात बसवून घेऊन गेले. हा प्रकार इतका अचानक झाला की गावात गोंधळ उडाला आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली.

पोलिसांचा वेगाने तपास सुरू 

खेड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपहरण, मारहाण, बळजबरी, धमकी यासह विविध गंभीर कलमांखाली एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये प्राजक्ताचा भाऊ, आई व इतर नातेवाईकांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तातडीने तपास सुरू केला असून, प्राजक्ताचा ठावठिकाणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जातीय सलोखा बिघडू नये यासाठी आम्ही विशेष दक्षता घेत आहोत. आरोपी लवकरच ताब्यात येतील.”

ही घटना केवळ एक प्रेमप्रकरण किंवा कौटुंबिक वाद नाही, तर समाजातील अजूनही ठासून भरलेली जातीयता आणि जुनाट विचारधारा याचं तीव्र दर्शन घडवत आहे. प्राजक्ताचं अपहरण तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याची शक्यता असल्याने कायद्याच्या दृष्टीनेही हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे.प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता ठेवण्यात आली आहे.