Jyeshtha Gauri Avahana 2024 : नवधूंसाठी गौरीचा ओवसा का महत्वाचा असतो? वाचा

Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणेशोत्सवादरम्यान जेष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. गौरी आवाहानाचे फार महत्व असून यावेळी विवाहित महिला तिची पूजा करत उपवास धरत गौरीचा ओवसा भरतात. पण गौरीचा ओवसा भरण्यामागील कारण माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया…

Chanda Mandavkar | Published : Sep 9, 2024 5:51 AM IST / Updated: Sep 09 2024, 12:27 PM IST

15
यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी?

यंदा जेष्ठागौरी आवाहन येत्या 10 सप्टेंबरला असणार आहे. यानंतर गौरीचे विसर्जन 12 सप्टेंबरला असून या दिवशी सहा दिवसांच्या गणपती बाप्पालाही निरोप दिला जातो.जेष्ठगौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबरला रात्री 08 वाजून 02 मिनिटांनी सुरु होणार आहे. यानंतर जेष्ठागौरीचे विसर्जन रात्री 09 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

25
गौरी गणपतीचा सण

कोकणांमध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात, जेष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचं विसर्जन करायचं अशी चाल आहे. गौरी विविध ठिकाणी विविध रूपात पूजतात. मुखवटय़ांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरडय़ाच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात पूजल्या जातात. मुखवटय़ाच्या गौरी अत्यंत आकर्षक, सुंदर व अलंकृत असतात. या ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत असल्याने या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात.

35
गौरी ओवसा

गौरीपुजनामध्ये 'ओवसा' ही एक परंपरा दिसून येते. 'ओवसा' म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओवशाल्या 'ववसा' असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पुर्व नश्रत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येकवर्षी गौरीसमोर तिचा ओवसा भरू शकते. जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओवसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पुर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओवसा करण्याची वाट पाहावी लागते. म्हणूनच पहिला ओवसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मानसन्मान, आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओवसा हा प्रत्येकीसाठी खासच असतो.

45
ओवसा भरण्याचे महत्व

ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवासते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. हळदकुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही पाच अथवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई-वडील, सासू-सासरे, काका-काकू, मामा-मामी, दादा-वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, सोने चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. या पद्धतींमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे.

55
गौरीला आदिशक्तीचे रुप

गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. गौराईची पुजा अर्चना करून तिच्याकडून आर्शिवाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. 

आणखी वाचा : 

यंदा जेष्ठागौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

गौरी-गणपतीसाठी शास्रोक्त पद्धतीने नैवेद्याचे पान कसे वाढावे? पाहा VIDEO

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos