Pakistani Woman Pleads With PM Modi : कराचीची रहिवासी असलेल्या निकिता नावाच्या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. पतीने तिला सोडून भारतात गुपचूप दुसरे लग्न करण्याची तयारी करत असल्याचा आरोप तिने केला आहे.

Pakistani Woman Pleads With PM Modi : एका पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. कराचीची रहिवासी असलेल्या निकिताने मोदींकडे मदत मागितली आहे. तिने सांगितले की, दीर्घकालीन व्हिसावर इंदूरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या विक्रम नागदेवसोबत तिचे २६ जानेवारी २०२० रोजी कराचीमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाले होते. पण आता पतीने तिला सोडून दुसरे लग्न करण्याची योजना आखली आहे. COVID-19 लॉकडाऊन दरम्यान विक्रमने तिला पाकिस्तानात परत जाण्यास भाग पाडले. पतीने तिला कराचीमध्ये सोडून दिले असून तो दिल्लीत गुपचूप दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याची तक्रार महिलेने केली आहे.

कराचीची रहिवासी निकिता हिने दीर्घकालीन व्हिसावर इंदूरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या विक्रम नागदेवसोबत २६ जानेवारी २०२० रोजी कराचीमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. एका महिन्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजी विक्रम तिला भारतात घेऊन आला. पण काही महिन्यांतच तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले, असे निकिता सांगते.

९ जुलै २०२० रोजी, व्हिसाच्या समस्येमुळे निकिताला पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. त्यानंतर विक्रमने तिला परत आणण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असा दावा तिने केला आहे. 'मी त्याला मला भारतात परत बोलवण्यासाठी विनंती करत राहिले, पण त्याने नेहमीच नकार दिला. आता तो दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे. जर न्याय मिळाला नाही, तर महिलांचा न्यायावरील विश्वास उडेल. अनेक मुलींना त्यांच्या सासरी शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागते. सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहावे,' असे आवाहन निकिताने एका व्हिडिओ संदेशात केले आहे. 'माझ्या पतीचे माझ्या एका नातेवाईकाशी संबंध असल्याचे मला समजले. जेव्हा मी हे पतीच्या घरी सांगितले, तेव्हा मुलग्यांचे विवाहबाह्य संबंध असू शकतात, असे उत्तर मिळाले.' विक्रम दिल्लीतील एका मुलीशी दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यावर तिने २۷ जानेवारी २०२५ रोजी लेखी तक्रार दाखल केली.

हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अधिकृत केलेल्या 'सिंधी पंच मेडिएशन अँड लीगल कौन्सिल सेंटर' समोर आले. विक्रम आणि त्याच्या होणाऱ्या वधूला नोटीस बजावण्यात आली आणि सुनावणी झाली. दोघेही भारतीय नागरिक नसल्यामुळे, हे प्रकरण पाकिस्तानच्या अधिकारक्षेत्रात येते, असे केंद्राच्या ३० एप्रिल २०२५ च्या अहवालात म्हटले आहे. विक्रमला पाकिस्तानात हद्दपार करण्याची शिफारस देखील करण्यात आली.