अमेरिकेतील एका भारतीय स्टार्टअप संस्थापकाने आपली व्यथा मांडली आहे. कंपनी उभी करण्याच्या नादात गेल्या २ वर्षांपासून आई-वडिलांना भेटता आलं नाही आणि तणावामुळे २० किलो वजन वाढल्याचं त्याने सांगितलं.

आपलं स्वतःचं स्टार्टअप सुरू करणं आणि ते यशस्वी करणं हे बाहेरून जितकं भारी वाटतं, तितकं सोपं नसतं. यामागे प्रचंड मेहनत, त्याग आणि तडजोडी असतात. अमेरिकेत राहणाऱ्या उत्कर्ष नंदा नावाच्या एका भारतीय टेक उद्योजकाने आपला हाच अनुभव एका व्हिडिओतून मांडला आहे. कंपनीच्या कामात तो इतका गुंतला की, त्याचं स्वतःच्या आरोग्याकडे आणि घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं.

उत्कर्ष सांगतो की, गेल्या दोन वर्षांपासून तो आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरीच गेलेला नाही. कामाच्या प्रचंड तणावामुळे त्याचं आरोग्यही बिघडलं. काही महिन्यांतच त्याचं वजन तब्बल २० किलोने वाढलं. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका लहानशा खोलीत बसून दिवस-रात्र काम करताना दिसतोय. फक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याला दोन वर्षं घरी जाता आलं नाही.

आपल्या खोलीत डाएट कोकच्या बाटल्यांचा ढिगारा दाखवत उत्कर्ष म्हणतो, "कामाच्या प्रेशरमुळे मला चुकीच्या सवयी लागल्या आणि त्यामुळेच माझं वजन इतकं वाढलं."

View post on Instagram

"माझा आत्मा वाचवण्यासाठी मला १० लाख डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे," असं कॅप्शन उत्कर्षने या व्हिडिओला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. स्टार्टअप सुरू करताना आपल्यालाही अशाच प्रकारच्या एकटेपणाला आणि तणावाला सामोरं जावं लागतं, असं अनेक उद्योजकांनी म्हटलं आहे. उत्कर्ष हा 'माइंडहब' (MindHub) नावाच्या कंपनीचा संस्थापक आहे. ही कंपनी AI संभाषणं एकत्र करून त्यातून एक सोशल नेटवर्क तयार करण्याचं काम करते.