सार

पाकिस्तान व्याप्त बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली असून, बलुच नेते मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडे मान्यता मागितली आहे. भारताला दिल्लीत बलुचिस्तानचे दूतावास सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

दिल्ली: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचले असताना, पाकिस्तानसमोरील संकट अधिकच गहिरे झाले आहे. पाकव्याप्त बलुचिस्तानने थेट स्वतंत्र्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. बलुच नेते मीर यार बलोच यांनी सोशल मिडियावरून ही माहिती देत बलुचिस्तानचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे मान्यता मागत नवी दिल्लीतील बलुच दूतावासासाठी अधिकृत परवानगीची विनंतीही केली आहे.

बलुच नेत्यांची ठाम भूमिका

मीर यार बलोच यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, "दहशतवादी पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. आम्ही आमचे स्वातंत्र्य घोषित करतो आणि भारताला दिल्लीतील बलुचिस्तानचे अधिकृत दूतावास सुरू करण्याची विनंती करतो." त्यांनी संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्रात बलुचिस्तानला स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची मागणी केली असून, सर्व सदस्य राष्ट्रांची तातडीने बैठक बोलवावी अशी विनंतीही केली आहे.

स्वातंत्र्याची मूर्त रुपरेषा

मीर बलोच यांनी बलुचिस्तानच्या पुढील वाटचालीबाबत काही ठळक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत:

नवीन चलन आणि पासपोर्ट छापण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी

पाकिस्तानच्या ताब्यातील भूभाग मुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेची गरज

पाकिस्तानच्या लष्करी, पोलिस, आयएसआय व नागरी कर्मचाऱ्यांनी बलुचिस्तान ताबडतोब सोडावे

स्वतंत्र बलुचिस्तानसाठी संक्रमणकालीन सरकारची लवकरच घोषणा

दडपशाहीच्या विरोधात वर्षानुवर्षांचा लढा

बलुचिस्तान हा भाग अनेक दशकांपासून अस्थिर व फुटीर प्रवृत्तीचा केंद्रबिंदू राहिला आहे. पाकिस्तानी सरकारकडून या प्रदेशात सतत राजकीय दुर्लक्ष, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचा व स्वातंत्र्याचा आवाज सातत्याने उठत राहिला आहे.

बीएलएचे हल्ले, लष्कराला मोठा फटका

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने अलीकडेच पाकिस्तानी लष्करावर दोन भीषण हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 14 सैनिक ठार झाल्याचे वृत्त असून, या कारवायांमुळे या हालचालींना अधिक गती मिळाल्याचे जाणवते.

बलुचिस्तान होणार स्वतंत्र राष्ट्र?

ही घोषणा केवळ प्रतीकात्मक की वास्तवतेकडे जाणारा प्रवास? बलुचिस्तान खरंच पाकिस्तानपासून वेगळं होणार का? हे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे राहत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानची अडचण नक्कीच वाढली आहे.