सार
मुंबईतील साकीनाका परिसरात गुरुवारी रात्री एक संशयास्पद ड्रोन दिसल्याची माहिती पुढे येताच खळबळ उडाली आहे.
मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने गंभीर वळण घेतले असून, देशाच्या विविध भागांत सुरक्षेची स्थिती सतर्क करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईतील साकीनाका परिसरात गुरुवारी रात्री एक संशयास्पद ड्रोन दिसल्याची माहिती पुढे येताच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांनी तातडीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून, स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ड्रोन कुठे आणि कसा दिसला? प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान साकीनाका परिसरातील हजरत तय्यद जलाल मस्जिदच्या वर एक ड्रोन फिरताना स्थानिक नागरिकांनी पाहिलं. काही क्षणातच तो ड्रोन साकिनाका झोपडपट्टी भागाकडे वळला. ही माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळताच सहार विमानतळ येथून एक फोन आला आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
कोम्बिंग ऑपरेशनचा तपशील घटनेच्या गांभीर्यामुळे साकिनाका पोलीस ठाण्याने तातडीने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. पोलीस आणि CISF च्या संयुक्त पथकांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जरीमरी परिसरातील हरी मस्जिद भागात शोधमोहीम राबवली. यामध्ये ड्रोन किंवा अन्य कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी पोलिसांनी तपास पूर्ण होईपर्यंत सतर्कता बाळगण्याचं निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानकडून सीमारेषेवर तिहेरी हल्ला या घटनेपूर्वी गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेवर 15 ठिकाणी तिहेरी हवाई हल्ला करण्यात आला. ड्रोन, रॉकेट लाँचर आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने या हल्ल्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमसह एल-70 आणि Zu-23 मिमी अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि शिल्का प्रणालीने हा हल्ला निष्फळ ठरवला.
भारताची प्रत्युत्तर कारवाई या हल्ल्याचा करारा प्रतिउत्तर देताना, भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर युद्धनौकांनी कराची बंदरावर जोरदार कारवाई केली. भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील अनेक प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करून शत्रूच्या रणनैतिक स्थानांना लक्ष्य केलं. ही कारवाई रात्रभर सुरू होती.
दिल्लीतील हालचाली आणि महत्त्वपूर्ण बैठक पाकिस्तानच्या या कारवायांमुळे दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असून, भारत लवकरच पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
पोलिसांचं आवाहन साकीनाका परिसरातील घटनेनंतर निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू असून, कोणतीही दुजोऱ्याची बाब सापडल्यास नागरिकांना माहिती देण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात संशयास्पद घडामोडींचं निदर्शनास येणं, हे दोन्ही मुद्दे गंभीर आहेत. सध्या देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. नागरिकांनी शांतता राखून अधिकृत माहितीचीच नोंद घ्यावी, हाच प्रशासनाचा संदेश आहे.