AI Protest सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) विकासाविरोधात 'स्टॉप द एआय रेस' या घोषणेसह मोठी निदर्शनं झाली. AI मुळे मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत आंदोलकांनी AI चा विकास तात्पुरता थांबवण्याची मागणी केली आहे.  

AI Protest जगातील प्रमुख टेक हबपैकी एक असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) विकासाविरोधात जोरदार निदर्शनं झाली. 'स्टॉप द एआय रेस' (Stop the AI Race) असा नारा देत सुमारे २०० लोकांनी शहरातील प्रमुख AI कंपन्यांच्या कार्यालयांवर मोर्चा काढला. अँथ्रॉपिक (Anthropic) कंपनीच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा नंतर ओपनएआय (OpenAI) आणि एक्सएआय (X AI) यांसारख्या कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत पोहोचला.

पॉज एआय (Pause AI) आणि क्विटजीपीटी (QuitGPT) यांसारख्या संघटनांनी या निदर्शनांचं आयोजन केलं होतं. यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि AI कंपन्यांचे माजी कर्मचारीही सहभागी झाले होते. आंदोलकांची मागणी आहे की, सर्व प्रमुख AI कंपन्यांनी एकत्र येऊन AI चा विकास तात्पुरता थांबवावा. आयोजकांच्या मते, AI टेक्नॉलॉजी मानवासाठी धोकादायक ठरू शकेल इतक्या वेगाने पुढे जात आहे. कंपन्या सुरक्षेची आश्वासनं तोडत असून, यामुळे मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. विशेषतः, अँथ्रॉपिक कंपनीने धोकादायक AI चा विकास थांबवण्याच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे आणि ओपनएआयची सुरक्षेबाबतची वचनबद्धता कमकुवत झाली आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

दरम्यान, प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेफ्री हिंटन यांनी AI च्या वाढीबद्दल व्यक्त केलेली चिंता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायबर गुन्हे, निवडणुकांमध्ये हस्तक्षेप आणि स्वयंचलित शस्त्रं यांसारख्या गोष्टींसाठी AI चा गैरवापर होऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाऊ शकतात आणि भविष्यात AI मानवावर मात करू शकतं, असा इशारा त्यांनी दिला होता.

भारतासह अनेक देशांमध्ये AI वर आधारित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे रिपोर्ट्स समोर येत आहेत. डीपफेक व्हिडिओ आणि व्हॉईस क्लोनिंगचा वापर करून होणारे गुन्हे चिंतेचा विषय बनले आहेत. दुसरीकडे, विविध देश AI वर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वं तयार करत आहेत. युरोपियन युनियनचा AI कायदा आणि भारताची AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क ही त्याचीच उदाहरणं आहेत. तज्ज्ञांच्या मते, AI टेक्नॉलॉजीचे फायदे आणि धोके यांच्यात संतुलन साधणं अत्यंत आवश्यक आहे. विकास सुरूच राहील, पण त्याचबरोबर सुरक्षितता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरत आहे.