- Home
- Utility News
- Online Payment Rules : आता 10 हजार रुपयांपेक्षा अधिकचे पेमेंट लगेच होणार नाही, RBI ने सांगितले कारण
Online Payment Rules : आता 10 हजार रुपयांपेक्षा अधिकचे पेमेंट लगेच होणार नाही, RBI ने सांगितले कारण
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता ₹10,000 पेक्षा जास्त रकमेचं ऑनलाइन पेमेंट लगेच होणार नाही. तुम्हाला चुकीचं ट्रान्झॅक्शन रद्द करता यावं यासाठी 1 तासाचा होल्ड टाइम मिळेल. जाणून घ्या काय आहेत हे नवे नियम...

ऑनलाइन पेमेंटचा नवीन नियम काय आहे?
तुमच्यासोबत असं कधी झालंय का, की तुम्ही चुकून भलत्याच नंबरवर पैसे पाठवले आणि नंतर पश्चात्ताप झाला? किंवा एखाद्या अनोळखी कॉलच्या दबावाखाली येऊन घाईघाईत पेमेंट केलंय? तुमचं हेच टेन्शन कमी करण्यासाठी RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) एक जबरदस्त नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार, आता ₹10,000 पेक्षा जास्त रकमेच्या ऑनलाइन ट्रान्सफरवर तुम्हाला ६० मिनिटांचा 'सेफ्टी टाइम' मिळेल.
पेमेंटमध्ये 1 तासाची दिरंगाई का?
सध्या आपण 'Pay' बटण दाबताच पैसे लगेच समोरच्याच्या खात्यात जमा होतात. सायबर गुन्हेगार (Scammers) याच घाईचा फायदा घेतात. RBI च्या नव्या प्रस्तावानुसार, जर तुम्ही ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम पाठवत असाल, तर ती रक्कम समोरच्या व्यक्तीला लगेच मिळणार नाही. त्या १ तासाच्या काळात तुम्ही ट्रान्झॅक्शन तपासू शकता. जर चुकून पेमेंट झालं असेल, तर ते रद्द करू शकता किंवा फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास पेमेंट थांबवू शकता. RBI फक्त वेळेची मर्यादाच नाही, तर ३ नवीन फीचर्सही आणत आहे.
RBI च्या नवीन नियमात ३ खास फीचर्स
- ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा: 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसोबत फसवणुकीच्या घटना अनेकदा घडतात. आता ₹50,000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटसाठी घरातील एखाद्या विश्वासू व्यक्तीची (Trusted Person) संमती आवश्यक असेल. म्हणजेच, घरच्यांना माहिती दिल्याशिवाय मोठं ट्रान्झॅक्शन करता येणार नाही.
- 'व्हाइटलिस्ट'ची (Whitelist) सोय: जर तुम्ही तुमच्या भावाला, वडिलांना किंवा विश्वासू दुकानदाराला नियमित पैसे पाठवत असाल, तर तुम्ही त्यांना 'व्हाइटलिस्ट'मध्ये टाकू शकता. अशा लोकांना पैसे पाठवताना १ तासाचा नियम लागू होणार नाही आणि पैसे लगेच पोहोचतील.
- डिजिटल 'किल स्विच' (Kill Switch): तुमचा फोन हॅक झाला आहे किंवा एखादं ॲप तुमच्या बँक खात्यात गडबड करतंय, अशी शंका आल्यास तुम्ही एका बटणावर तुमच्या सर्व डिजिटल बँकिंग सेवा त्वरित बंद करू शकाल. यासाठी कस्टमर केअरला लांबलचक कॉल लावण्याची गरज पडणार नाही.
अखेर याची गरज का पडली?
आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या वर्षी देशात सुमारे ₹22,000 कोटींची डिजिटल फसवणूक झाली. धक्कादायक बाब म्हणजे, ₹10,000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार संख्येनं कमी असले, तरी एकूण फसवणुकीच्या रकमेपैकी 98.5% वाटा याच मोठ्या व्यवहारांचा आहे. त्यामुळेच RBI ने मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा नियम कधीपासून लागू होणार?
सध्या RBI बँका आणि NPCI सोबत याच्या तांत्रिक बाबींवर काम करत आहे. पेमेंट सुरक्षितही व्हावं आणि लोकांना जास्त त्रासही होऊ नये, हे एक आव्हान आहे. येत्या काही महिन्यांत यासंबंधीची अंतिम मार्गदर्शक तत्त्वं (Final Guidelines) येण्याची शक्यता आहे.

