यंदा पापमोचनी एकादशीचं व्रत १५ मार्च, रविवारी आहे. हिंदू विक्रम संवत वर्षातील ही शेवटची एकादशी असल्यामुळे धर्मग्रंथांमध्ये तिला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. विशेष म्हणजे, यंदा पापमोचनी एकादशीला अनेक शुभ योगही जुळून येत आहेत.
Papmochani Ekadashi Vrat Katha: चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला 'पापमोचनी एकादशी' म्हणतात. नावावरूनच कळतं की, हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. ही कथा ऐकल्यानेच हजार गायी दान केल्याचं पुण्य मिळतं, असं मानलं जातं. इतकंच नाही, तर ब्रह्महत्या किंवा सोन्याची चोरी यांसारख्या मोठ्या पापांमधूनही मुक्ती मिळते. हे व्रत करणारी व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्गात जाते, अशी श्रद्धा आहे. पुढे वाचा या व्रताची रंजक कथा…
पापमोचनी एकादशीची कथा
फार पूर्वी चैत्ररथ नावाचं एक घनदाट जंगल होतं. तिथे अप्सरा नेहमी ये-जा करायच्या. त्याच जंगलात मेधावी नावाचे एक ऋषी तपश्चर्या करत होते. एक दिवस मंजुघोषा नावाच्या एका अप्सरेने त्यांना आपल्या मोहात पाडलं. महर्षी मेधावीसुद्धा तिच्या सौंदर्यावर इतके भाळले की ते आपला भक्तीमार्ग विसरले आणि तिच्यासोबत रममाण झाले.
महर्षी मेधावी आणि अप्सरा मंजुघोषा यांना एकत्र राहून तब्बल ५७ वर्षं निघून गेली. जेव्हा महर्षी मेधावींना आपली तपश्चर्या भंग झाल्याचं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी रागाच्या भरात मंजुघोषाला पिशाचिनी होण्याचा शाप दिला. शापामुळे ती अप्सरा पिशाचिनी बनली. तेव्हा तिने महर्षींना या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा महर्षी मेधावींनी तिला पापमोचनी एकादशीचं व्रत करण्याचा सल्ला दिला.
यानंतर, महर्षी मेधावींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली. ते थेट आपले वडील च्यवन ऋषी यांच्याकडे गेले आणि या पापातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. च्यवन ऋषींनीही आपल्या मुलाला पापमोचनी एकादशीचं व्रत करायला सांगितलं. अशा प्रकारे, ऋषी मेधावी आणि अप्सरा मंजुघोषा या दोघांनीही विधीपूर्वक पापमोचनी एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या प्रभावाने ते दोघेही पापमुक्त झाले.
पापमुक्त झाल्यावर मंजुघोषा पुन्हा स्वर्गात परत गेली आणि ऋषी मेधावींनाही त्यांचं तपश्चर्येचं सामर्थ्य परत मिळालं. या एकादशीचं व्रत केल्याने सर्व पापांमधून मुक्ती मिळते. इतकंच नाही, तर जो कोणी ही कथा ऐकतो, त्याचीही पापं नष्ट होतात. म्हणूनच, व्रत करणाऱ्या व्यक्तीने पापमोचनी एकादशीची कथा अवश्य ऐकावी.
Disclaimer
या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांकडून घेतली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीकडे केवळ एक सूचना म्हणून पाहावं.


